Monday 30 November 2015

पुरवणी क्र. २

फार फार वर्षांपूर्वी एका मोठ्या राज्याचा राजा होता. पण त्याला मुलबाळ नव्हतं. त्याच्यानंतर त्याचं राज्य सांभाळायला त्याला एक वारस हवा होता. म्हणून तो ठरवतो की एका मुलाला दत्तक घ्यावं.

मग तो संपूर्ण राज्यात दवंडी देतो की मला एक मुलगा दत्तक घ्यायाचा आहे तरी इच्छुक मुलांनी राजवाड्यात यावे. 

दुसऱ्या दिवशी राजवाड्यात मुलांची गर्दी होते. मग राजा सगळ्या मुलांना एक-एक बी देतो व सांगतो की ही बी पेरा व एक वर्षानंतर बघून मी ठरवेन की कोणत्या मुलाला वारस म्हणून दत्तक घ्यायचं.

सगळी मुले मग बी घेऊन घरी जातात व ती बी कुंडी मध्ये लाऊन त्याची काळजी घेऊ लागतात. काही दिवसांनी सगळ्यांच्या कुंड्यांमध्ये कोंब दिसायला लागतात. पण एक तुषार नावाचा मुलगा असतो त्याच्या कुंडी मध्ये मात्र कोंब येत नाही. तरीही तो कुंडीत पाणी घालत राहतो. अजून काही महिन्या नंतर सगळ्यांच्या कुंडीतली रोपे मोठी होऊ लागतात, त्यांना फुले येऊ लागतात, पण तरीही तुषारच्या कुंडी मध्ये काहीही उगवत नाही. बाकीची सगळी मुले तुषारला चिडवू लागतात. तरीही तो त्याच्या कुंडीत पाणी घालत राहतो.

शेवटी निर्णयाचा दिवस उगवतो. राजाने सगळ्यांना कुंड्या घेऊन राजवाड्यात बोलावलेले असते. तुषार त्याच्या आईला म्हणतो की “मी नाही जात राजवाड्यात कारण की माझ्या कुंडीत काहीही उगवले नाही. मी जरी कुंडीत रोज पाणी टाकलेले आहे तरी राजाचा त्यावर विश्वास बसणार नाही व त्याला वाटेल की मी आळशी आहे. मी कुंडीत पाणी घातले नाही म्हणूनच माझ्या कुंडीत काहीही उगवले नाही. कदाचित राजा मला शिक्षा देईल.” 

तेव्हा त्याची आई त्याला समजावून सांगते की “अरे, आपण जर मनापासून प्रयत्न केले आहेत तर आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. तू जा व सगळ खरं खरं राजाला सांग.”


तुषार राजवाड्यात येतो तर सगळी मुले आधीच तेथे जमलेली असतात. सगळ्यांच्या कुंड्यांमध्ये छान छान रोपे उगवलेली असतात. कुणाच्या कुंडीत फुलांचं रोप असतं तर कुणाच्या कुंडीत छान झुडूप असत. सगळ्यांच्या कुंड्या सुंदर रोपांनी भरलेल्या असतात. तो अजूनच नाराज होतो व कोपऱ्यात जाऊन शांत पणे उभा राहतो.


तेवढ्यात राजा राजवाड्यात येतो व सगळे शांत होतात. राजा सगळ्यांच्या कुंड्या बघत बघत चक्कर मारू लागतो. राजा तुषार जवळ पोचतो व थांबतो. राजाच्या चेहऱ्यावर मंद स्मित असतं. 

राजा तुषारला विचारतो, “सगळ्यांच्या कुंड्या मध्ये रोपे आहेत पण तुझ्या कुंडीत काहीच कसं नाही?” त्यावर तुषार राजाला उत्तर देतो, 

“मी कुंडीला रोज पाणी टाकलं, तिची काळजी घेतली पण त्यातून काहीच उगवलं नाही.” राजा हे ऐकून शांतपणे पुढे जातो व उरलेल्या कुंड्या पाहून परत समोर जाऊन उभा राहतो.


निर्णय देतेवेळी राजा गंभीर होतो व म्हणतो की “तुम्हा सर्वांच्या कुंड्या मी बघितल्या, त्यात खूप सुंदर रोपे उगवली आहेत, परंतु मी मला हवा असलेला वारस/उत्तराधिकारी निवडला आहे व त्याचे नाव आहे .... तुषार!”





तुम्हाला काय वाटते, राजाने तुषारलाच वारस म्हणून का बरे 

निवडले असेलयावर गटात चर्चा करा, आपल्या गटाचे

मिळून एक उत्तर तयार करा व आम्हाला पाठवा. त्या गटाला 

मिळेल एक छानशी भेट!



No comments:

Post a Comment