Wednesday, 1 August 2018

तीन ठिकाणी झाले गेटटुगेदर


देगाव येथील गेटटुगेदर
‘आम्ही नेहमीप्रमाणे प्रगती कुमार निर्माण संघाची बैठक सुरु केली. आम्ही सर्वांनी भरारी वाचले. त्यात गेटटुगेदरची माहिती व गेटटुगेदर करा असं लिहिले होते. मग या बैठकीमध्ये गेटटुगेदर करायचे ठरवले.
त्यानंतर एक दोन दिवसांनी सगळ्या मुलांनी घरातून गेटटुगेदरसाठी म्हणजेच देगावला जाण्यासाठी परवानगी मागितली व आई-वडिलांनी परवानगी दिली. नंतर देगावला जाण्यासाठी एसटीचा वेळ काढण्याची जबाबदारी कुणाल, प्रियांशु, तन्मय यांना सोपवली. सरांनी त्यांच्या मोबाईलवर आलेले निमंत्रण पत्राचे फोटो आम्हाला दाखवले व वाचायला सांगितले. त्यात जोक्स, कोडी, गाणी व ग्रामपंचायत जवळचे गवत काढावे अशी विनंती केली होती. त्या सोबतच भेळ करावी असेही लिहिले होते. आम्ही त्या सर्व विनंती स्वीकार केल्या. भेळीसाठी प्रत्येकाने आपापल्या घरातून एक-एक कांदा आणायचे ठरवले. भेळीसाठी लागणाऱ्या सामानाची दोन यादी केली. बाजारातून भेळीसाठी लागणारे सामान आणायची जबाबदारी मुलांनी घेतली. त्यानंतर कुणाल म्हणाला उन्हवऱ्याला जाणारी एकही एसटी नाही. प्रियांशु म्हणाला, देगावला एक बस जाते. मग सर म्हणाले, आपल्याला ट्रॅक्स, स्कूल बस किंवा मॅजीक सारख्या गाड्या मिळाल्या तरी चालेल. मग सर्व मुलांनी आपापल्या ओळखीच्या गाडीवाल्या दादांना विचारायचं ठरवलं. मग नंतर एकही गाडी मिळाली नाही. मग सरांनी सुद्धा विचारायचे प्रयत्न केले. त्यानंतर मुले बाजारात १२०० रु. घेऊन भेळीचे सामान आणायला गेले व सामान आणले. सामान आणायला सरांनी मुलांना त्यांच्याकडचे ५०० रु. दिले होते. त्यातल्या ५४५ रुपयांची खरेदी झाली. नंतर सरांना त्यांचे ५०० रु. परत केले. त्यानंतर एक टाटा मॅजीक गाडी भेटली. आमच्या सर्वांच्या मनात देगावला जाण्याचा विचार सतत फिरत होता. १५/७/२०१८ ला सकाळी मी तयारी करून साक्षीच्या घरी गेले. तिथून मी आणि साक्षी सरांच्या घरी जायला निघालो. तेव्हा साक्षीला चव्हाण काकींच्या दुकानातून चॉकलेट्स घ्यायचे होते. पण चव्हाण काकींचे दुकान बंद होते. मग आम्ही परत फिरलो आणि दुसऱ्या दुकानातून चॉकलेट्स घेतले. तेव्हा तिथे तन्मय आला. नंतर आम्ही तिघे सरांच्या घरी गेलो. हळूहळू सगळे सरांच्या घरी जमले. नंतर गाडी आली. आम्ही गाडीत बसलो व भेळीचे समान देखील गाडीत ठेवले. आम्ही जाताजाता गाण्यांच्या भेंड्या खेळत गेलो. आम्ही देगावला तेव्हा तिथे बाई व इतर मुले आली.
आम्ही एका वर्गातले सगळे बेंच दुसऱ्या वर्गात ठेवले आणि एक वर्ग रिकामा केला. त्या वर्गात आम्ही सगळे जण बसलो. स्पंदन गटाने ओळख करण्यासाठी ओळखीचा गेम सांगितला. आम्ही तो खेळ १० वेळा खेळलो. नंतर स्पंदन गटाने त्यांच्या गटाची स्थापना होण्यापासून ते आजपर्यंत घडलेले सर्व काही सांगितले व त्याच्यावर आम्ही प्रश्न विचारले. नंतर प्रगती गटाने त्यांच्या गटात स्थापना होण्यापासूनचे व आजपर्यंतचे घडलेले सर्व काही सांगितले. नंतर स्पंदन गटाने त्याच्यावर प्रश्न विचारले. नंतर आम्ही कोडी विचारली व जोक्स सांगितले. नंतर आम्ही आपापला डब्बा खाल्ला. डबा खाल्ल्यानंतर आम्ही खजिना शोध हा गेम खेळलो. तो खेळ खेळायला खूप मज्जा आली. त्यानंतर आम्ही भेळीसाठी लागणारे साहित्य कापले व बाईनी मोठ्या पातेल्यात चुरमुऱ्याचा एक पुडा ओतला. त्यात कांदा, मीठ, टॉमेटो, चिंचेचे पाणी टाकले व ते सगळे वाटप केले. सर्व मुलांना बाईंनी रांगेत बसायला सांगितले. एका मुलीने सर्व मुलांना पेपर डिश वाटल्या. एका मुलाने सर्वांना भेळ वाटली. त्या भेळीवर एका मुलाने शेव टाकली. नंतर सर्व मुलांनी भेळ खायला सुरुवात केली. तेव्हा गाडीवाले काका आले. सरांनी गाडीवाल्या काकांना सांगितले की थोडा वेळ लागेल. त्यांना भेळ खायला बोलावले पण ते आले नाही. कारण ते घरातूनच जेवण करून आले होते. आम्ही आनंदात भेळ खाल्ली. भेळ खूप छान झाली होती. आम्ही सगळ्यांनी डब्यात भेळ नेली व दापोलीला जायला गाडीत बसलो. घरी जाता-जाता सेव्हन-अप, मेमरी गेम, भेंड्या खेळलो. आणि मी घरी जे काही केलं ते सगळे सांगितले. मला देगावला जायला खरच खूप मज्जा आली.’

दीक्षा
प्रगती संघ, जालगाव, दापोली
 पुण्यातील गेटटुगेदर
पुण्यातील तीन संघ Warriors of truth, Adventure group आणि सृष्टी संघ यांचे गेटटुगेदर शिवाजी हौसिंग सोसायटीतील एका बागेमध्ये करायचे ठरले. दिनांक २९ जुलै संध्याकाळी ४ ते ६ सर्वांनी एकत्र यायचे ठरले. सृष्टी संघाचे प्रसन्न दादा आपल्या टीमला घेऊन वेळेत आले. माझेही दोन्ही गट वेळेत आले. कुणी चालत तर कुणी सायकलवर मजलदरमजल करत मुले बागेत पोचले. जेव्हापासून गेटटुगेदर करायचे ठरले त्या दिवसापासून सर्वजण खूपच उत्सुक होते. त्या दिवशी पण सारखे माझ्या घराची बेल वाजवून, फोन करून करून मला विचारत होती; ताई जमायचे ना एकत्र? झाले आम्ही सारे जण एकत्र आलो. ‘हीच अमुची प्रार्थना ...’ या छानश्या प्रार्थनेने सुरुवात केली. एकमेकांची ओळख करून घेतली. मग मी कुमार निर्माण म्हणजे काय? याची सविस्तर माहिती सांगितली. डॉ. अभय बंग व विवेक सावंत यांचे फोटो दाखविले व त्यांची यामागची कल्पना सांगितली.
नंतर आम्ही सर्वजण ‘वादळ सुटलं, वारा सुटला’ हा खेळ खेळलो. मुलांना खूप आनंद झाला. कुणीतरी हरलं म्हणून आपण जिंकलो हे मुलांना पटलं. नंतर Warriors of truth मधल्या भूमी, भव्या, साना या तिघींनी गाणं म्हटलं.
मग मी एक पप्रेरणादायी अशी लिझीची गोष्ट सांगितली. त्यांनतर सर्व संघातील काही मुलांनी जोक्स सांगितले. मुलांना खूपच हसायला येत होते. मग मी काही कोडी विचारले. तर मुलांनी उत्साहाने ताबडतोब उत्तरे दिली.
खेळ गाणी, गोष्टी झाल्यावर प्रत्येक संघाने समोर येऊन आतापर्यंत काय काय कृतिकार्यक्रम केले याविषयी सांगितले. प्लास्टिक वापरू नका, कागदी पिशव्या वापरा हा छान संदेशही दिला. घोषणा देखील दिल्या. ‘कुमार निर्माण कुणाचे, आमच्या छोट्या दोस्तांचे’ असे ओरडत ओरडत मुले बागेमध्ये फिरली. मग माही सर्वांनी मिळून छान खाऊ खाल्ला. काही मुलांनी खाऊ आणला नव्हता, पण सर्व मुलांनी आपापले डबे शेअर केले. मी व प्रसन्न दादाने सर्व मुलांसाठी खाऊ आणला होता, तोही शेअर केला. प्रसन्न दादानेही एक खेळ घेतला. खूप मज्जा आली. या दिवसाची आठवण म्हणून सर्व मुलांनी वृक्षारोपण केलं. आश्चर्य म्हणजे जेव्हा मुलं राष्ट्रगीत म्हणत होती तेव्हा संपूर्ण बागेतील जेवढे लोक होते ते सर्वजण उभे राहिले. हम होंगे कामयाब हे गाणं मुलांनी अगदी उत्साहाने म्हटले. कार्यक्रम संपला असे सांगितले तरीही कुणाचाही पाय निघत नव्हता. मुलं पुन्हा पुन्हा एकत्र येऊन एकमेकांशी अजून ओळख करून घेत होती. सृष्टी गटातील मुले प्रसन्न दादाला विचारत होती दादा आपण कधी होस्ट व्हायचे? या मुलांना आपण कधी आपल्याकडे बोलवायचे ? पुन्हा लवकरच सर्वजण भेटूयात असे एकमेकांना आश्वासन देऊन सर्वजण निघाले. एक चांगला विचार घेऊन आपापल्या घरी.
संजना शहा, पुणे
बोदवड येथील गेटटुगेदर
आमच्या गटाचा ‘गेट टुगेदर’हा कार्यक्रम झाला. उडान व संस्कृती गटाचा. आम्ही बोदवड येथे या कार्यक्रमासाठी गेलो. तेथे तर माझ्या खूप मैत्रिणी झाल्या. स्वाती, अश्विनी, पायल, लक्ष्मी, रितीका मयुरी, मयुरी ही त्यांची नावे. आणखीही खूप आहेत. पण नावं आठवत नाही हो! तेथे आम्हाला म्हणजे मला खूप मजा आली.
आधी आमचा असा खेळ झाला की ज्याने आमचा परिचय होईल. एक होता ‘परदेके पीछे क्या हे?’ आणि एकाचं नावं ठाऊक नाही मले. ठाऊक म्हणजे काय माहिती आहे का? ‘ठाऊक’ म्हणजे ‘माहिती’ बरं का ! आमची भाषा कळणार नाही तुम्हाला. पण आमची भाषा खूप चांगली आहे.
बोदवडला झालेले दोन्ही खेळ पण छानच होते. दोन्हीही मले खूप आवडले. त्यानंतर आमचा नाश्ता तयार झालं होता. मग नाश्ता झाल्यावर एक कृती गीत घेतले. त्याचे नाव ‘चाळणी मला गाळ ग नीट’ असंच काहीतरी होतं. पण मी सांगितलं तसं नाही बरं का! काय होते गड्या ?  हा! आठवलं आठवलं ‘चाळणीतलं पीठ म्हणे चाळ मला नीट’ हे होते. त्या कुरती गीताचे नाव. स्वारी स्वारी कृतीगीत म्हणतात त्याला ! स्वारी अं गलती झाली. माफ करा मला. केलंना मला माफ ?
जाऊ द्या मग आपण पुढे जाऊ. मग आम्हाला एक ‘जॉय’ नावाचा विडीयो दाखवला. खूप छान विडीयो होता. तो विडीयो पाहिल्यावर एक चित्रपट दाखवले. त्याचे नावं ‘द गुड डायनासोर’ हे होते. इतके छान चित्रपट होते की सांगूच काय? मला तर तीन वेळा रडू आलं तो चित्रपट बघताना. मग तो चित्रपट पाहून झाल्यावर आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यावर १० ते १५ मिनिट फिरलो. मग पुन्हा दोन-तीन कृतीगीतं घेतली. परत गुरुपोर्णिमेचाही कार्यक्रम झाला. अध्यक्ष बाऱ्हे सर व प्रमुख पाहुणे ढेंगे सर म्हणजे आमचे दादा होते. मग उडान गटाने कविता कृतीसह करून दाखवली आणि एक नाटिका केली. ती नाटिका ‘भारुड’ स्वरूपातली होती. तिचे नाव ‘मला दादला नको गं बाई’ दादला म्हणजे नवरा. हे सर्व झालं की आम्ही चहा पिलो.
योगेश जवंजाळ सरांना व संस्कृती गटाला ग्रीटिंग दिलं आणि आम्ही वृक्षारोपण केलं. दोन शिसमचे झाडं लावली. त्यांना सांगितलं की ही झाडे आमची आठवण म्हणून जगवा. मग आम्ही त्यांना बाय-बाय म्हणून गाणे म्हणत घरी परतलो.
दिक्षा जगदेव इंगळे.
‘उडान संघ’, भोटा, जळगाव.
  


दोघांचा बळी


त्या देशात नुकतीच राज्यक्रांती झाली होती. नवीन राजा गादीवर आला होता. तो राजा तरुण होता, उदार होता. आपला देश भरभराटीला यावा, सुखी व्हावा असे त्याला वाटत होते. इतर देशांचे कारभार कसे आहेत, त्या त्या देशांतून काय काय विशेष गोष्टी आहेत, ते पाहावे म्हणून तो तरुण राजा प्रवासासाठी निघून गेला. त्याने राज्याची सर्व जबाबदारी त्याच्या दोन प्रधानांवर सोपवली होती.
राज्यक्रांतीच्या वेळेस या दोन प्रधानांना लोक देवाप्रमाणे मानीत. त्यांच्या नावाचा जयजयकार केल्या जाई. किती त्यागी, किती थोर त्यांची देशभक्ती, असे सारे म्हणत; परंतु आता पूर्वीप्रमाणे लोकांची श्रद्धा त्यांच्यावर राहिली नाही. समाजात काही मत्सरी लोक असतातच. अशा मत्सरी लोकांनी त्या दोन प्रधानांच्या विरुद्ध सारखी मोहीम सुरु केली. हे प्रधान स्वार्थी आहेत, मानासाठी हपापलेले आहेत, राजाला ह्यांनीच प्रवासासाठी पाठवले, ह्यांना सर्व सत्ता स्वतःच्या हाती घ्यावयाची आहे, कसली देशभक्ती नि कसले काय, अशाप्रकारचा विषारी प्रचार त्यांनी सुरु केला. सभांतून, वर्तमानपत्रांतून, खाजगी बैठकींतून एकच सूर ऐकू येऊ लागला.
लोक चंचल असतात.. ते आज एखाद्याची पूजा करतील, उद्या त्याचीच कुतरओढ करतील. ते आज जयजयकार करतील, उद्या शिव्याशाप देतील. आज उंचावर चढवतील, उद्या खाली ओढतील, आज फुलांचे हार घालतील, उद्या दगड मारतील. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये. लोकांना जसे वळवावे तसे ते वळतात. अग्नीने सुंदर स्वयंपाक करता येतो, आगही लावता येते. लोकांना शांत ठेवता येते, त्यांना प्रक्षुब्धही करता येते. पाणी शांत असते, परंतु जोराचा वारा सुटला तर तेच पाणी प्रचंड लाटांचे रूप धारण करते. मोठमोठ्या बोटीही मग त्या लाटांसमोर टिकू शकत नाहीत. त्या प्रमाणे शांत राहणारी जनता कोणी एखाद्या गोष्टीचा तुफानी प्रचार केला तर खवळते. ती मग आवरता येत नाही.
राजधानीतील लोक त्या दोन प्रधानांविरुद्ध फारच बिथरले. एके दिवशी सायंकाळी विराट सभा झाली. द्वेषाची आग पाखडणारी भाषणे झाली. प्रधानांच्या घराकडे त्यांनी मोर्चा वळवला. ‘मारून टाका हे प्रधान; स्वार्थी बेटे; देशभक्त म्हणून मिरवतात; तुकडेतुकडे करा. आगा लावा त्यांच्या बंगल्यांना...’ असे ओरडत प्रक्षुब्ध जनता निघाली.
एक प्रधान घरात सापडला. दुसरा कोठे आहे? परंतु आहे त्याची तरी उडवा चटणी जो प्रधान सापडला त्याला लोकांनी फराफरा ओढीत आणले. कोणी दगड मारले. कोणी ढिपळे मारली. कोणी हात तोडला. हाल हाल करून त्या प्रधानाला मारण्यात आले. त्याचे डोके भाल्यावर रोवून ते मिरवण्यात आले. ‘देशद्रोह्यांना असे शासन हवे. स्वार्थी लोकांना हे बक्षीस मिळते...’ असे गर्जत लोक गेले.

परंतु तो दुसरा प्रधान कोठे आहे ? राजधानीतील काही विचारी माणसांनी एक पत्रक काढले. ‘एका प्रधानाचा लोकांनी सोक्षमोक्ष लावला. आता दुसऱ्याचा सूड घेण्यास ते अधीर झाले आहेत; परंतु हा खरा मार्ग नव्हे. प्रधानांची न्यायासनासमोर चौकशी होऊ दे. जर ते दोषी ठरले, त्यांच्यावर काही आरोप सिद्ध झाले, तर त्यांना होऊ दे शिक्षा. आता दुसऱ्या प्रधानास तरी न्यायासनासमोर उभे करा.’
‘होय, हे बरोबर आहे. ह्या दुसऱ्याची चौकशी करू या. सारी कृष्णकृत्ये बाहेर येऊ देत. त्यांचे इतर साथीदार कोण आहेत हेही कळेल. त्यांचाही नायनाट करता येईल.’ असे लोक म्हणू लागले. हे दुसरे प्रधान कोठे पळून जाऊ नये म्हणून त्यांना तुरुंगात ठेवण्यात यावे व न्यायाधीशांनी त्यांची लवकर चौकशी करावी अशाही मागण्या लोकांनी सभांतून केल्या. 
त्या दुसऱ्या प्रधानास तुरुंगात ठेवण्यात आले. स्वदेशातील ही सारी घडामोड राजाला कळविण्यात आली. केव्हा येणार राजा ? राजा येण्याच्या आतच पुन्हा जनता खवळनार तर नाही ना ? खवळली तर या प्रधानास कसे वाचविता येणार ?
तो दुर्दैवी प्रधान तुरुंगाच्या कोठडीत होता. त्याच्यावर न्यायालयात खटला सुरु होता. न्यायाधीशांना सुद्धा भीती वाटत होती की जर आपण या प्रधानाला निर्दोष म्हटले तर ही जनता आपल्याला देखील मारायला कमी करणार नाही. लवकर या खटल्याचा निकाल लागावा म्हणून जनता जोर करू लागली. राजा लवकर आला तर बरे होईल असे तो न्यायाधीशाला वाटू लागले.
राजापर्यंत या बातम्या पोहचल्या आणि राजा आपल्या प्रधानाला वाचवण्यासाठी परतीच्या प्रवासावर निघाला. ही बातमी प्रधानाच्या शत्रूंना समजली. राजा परत आला तर प्रधान वाचेल अशी भीती त्यांना वाटू लागली. त्यांनी देशद्रोही प्रधानाने तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला अशी अफवा पसरवायला सुरुवात केली. वणव्यासारखी ही अफवा संपूर्ण देशात पसरली. आधीच चिडलेली जनता अजूनच चिडली. मोठा जमाव प्रधानाच्या विरुद्ध घोषणा देत तुरुंगावर चालून गेला. त्यांनी तुरुंग अधिकाऱ्याचे ऐकले नाही की सैनिकांचे ऐकले नाही. एवढ्यामोठ्या जमावासमोर सैनिकांचे तरी काय चालणार. जमावाने तुरुंगातून प्रधानाला बाहेर काढले. त्याला हाल-हाल करून मारण्यात आले. प्रत्येकाला सूड घेण्याची इच्छा होती. लोकांची माणुसकी मेली होती. क्रोधाने सूडबुद्धीने माणसाचा पशु होतो.
राजा परत आला. उदार, प्रेमळ राजा परत आल्याने लोक शांत झाले. राजाने न्यायाधीशांना अभ्यास करून अहवाल द्यायला सांगितला. न्यायाधीशांनी अभ्यास करून अहवाल दिला की ते दोन्ही प्रधान देशद्रोही नसून देशप्रेमी होते. राज्यक्रांती मधील त्यांचे योगदान मोठे होते आणि नंतर देखील ते देशाच्या भल्यासाठी काम करत होते. हा निकाल ऐकून प्रजा हळहळली, लोक शोक करू लागले, प्रधानांच्या नावाचा जयजयकार करू लागले. राज दरबाराच्या प्रदर्शनी भागात त्या दोन्ही प्रधानांचे पुतळे बसवले गेले. लोक तिथे नियमित फुले वाहत. पण हाय! ते दोन प्रधान गेले ते गेलेच.

साने गुरुजींच्या ‘फुलाचा प्रयोग’ या गोष्टीवर आधारित
पुस्तक – साने गुरुजींच्या गोड गोड गोष्टी : भाग

कुमार गीत — आम्ही प्रकाशबीजे


आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो
वाटा नव्या युगाच्या रूळवित चाललो II धृ II
काट्यावरून जाता मागे न पाय घेऊ
हसऱ्या कळ्याफुलांची स्वप्ने विणून घेऊ
ओसाड माळ आम्ही फुलवीत चाललो
वाटा नव्या युगाच्या रूळवित चाललो. आम्ही प्रकाशबीजे...II II
आमुची सुखे निराळी विश्वात बिंबलेली
दुःखात निर्मितीची स्फूर्ती उफाळलेली
आमुचे भविष्य आम्ही घडवीत चाललो
वाटा नव्या युगाच्या रूळवित चाललो. आम्ही प्रकाशबीजे...II II
आले अपयश घाले पाया नव्या यशाचा
इतिहास साक्ष आहे आमुच्या पराक्रमाचा
प्रासाद सज्जनांचे सजवीत चाललो
वाटा नव्या युगाच्या रूळवित चाललो. आम्ही प्रकाशबीजे...II II
बदलार्थ वेचिती जे सर्वस्वही स्वतःचे
ते शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे
त्यांची स्मृती मनाशी जागवीत चाललो
वाटा नव्या युगाच्या रूळवित चाललो
आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो. आम्ही प्रकाशबीजे...II II


चित्र चर्चा

खालील चित्र बघून काय वाटतं? आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांसोबत या चित्रांचा संबंध जोडता येतो का चर्चा करा.




Tuesday, 26 June 2018

मुखपृष्ठ


अनुक्रमणिका



संवादकीय
सुट्ट्यांनंतर
पावसाचं पाणी
गेट-टुगेदर
मुलांच्या लेखणीतून
गोष्ट: सुखी माणसाचा सदरा
कोडं
कुमार गीत
क्षणचित्रे
चित्र चर्चा

मुखपृष्ठ: रेल्वे स्टेशन, आडवली

संपादकीय मंडळ




  • अमृत बंग
  • प्रफुल्ल शशिकांत
  • प्रणाली सिसोदिया
  • शैलेश जाधव

 संपर्क
प्रणाली ९७६७४८८३३७
शैलेश  ९५०३०६०६९८
इमेल : contact.knirman@gmail.com

 अंक तिसरा| जून २०१८
हे मासिक खालील लिंक वर मूळ स्वरुपात वाचता येईल
http://kumarnirman.blogspot.in/
(खाजगी वितरणासाठी)

संवादकीय


हेल्लो मित्र-मैत्रिणींनो,

आम्ही आशा करतो की तुम्ही सर्व मजेत असाल. आम्हीही इकडे मजेत आहोत. दरवर्षीपेक्षा यावर्षीच्या उन्हाळ्याने जरा जास्तच जोर धरला होता. दुपारी बाहेर पडायची सोय देखील उरली नव्हती. दरवर्षी असा वाढत जाणारा उन्हाळा बघुन जाणवतं की हळू हळू का होईना पण पर्यावरण किती बिघडत चाललंय आणि पर्यायाने पृथ्वीला हे किती हानिकारक ठरत असेल! पण अशावेळी दुसऱ्या बाजूला कुमार निर्माणमधील तुम्ही मुलं झाडं लावतात, त्यांना जगवतात, कुठेही कचरा फेकत नाहीत, प्लास्टिकचा वापर कमी करताय, फटाके फोडण्याचं व होळीला कृत्रिम रंग खेळण्याचंही प्रमाण हळूहळू तुम्ही कमी करताय. त्यातून तुम्ही पर्यावरणाची सोबतच निसर्गाची काळजी घेतात, हे पाहून आणि तुमचा खारीच्या वाट्याचा सहभाग पाहून तुमच्या रुपात एक आशेचा किरण आम्हाला सतत दिसत राहतो!
तर मंडळी, नुकतीच भली मोठ्ठी सुट्टी संपवून तुम्ही सगळेजण शाळेला हजर झाले असणार. आम्हाला खात्री आहे की या सुट्टीत तुम्ही भरपूर धम्माल केली असेल, तुमच्यातील काही जण मामा-मावशीच्या गावाला गेले असाल, काहींनी शेतात मस्ती केली असेल, तर काही जण कुटुंबासोबत फिरायलाही गेले असतील.
सुट्टी असुनही शक्य होते त्याठिकाणी कुमार निर्माणचे संघ व बैठका हे नियमित सुरु होते. सुट्टी म्हटल्यावर मज्जा ही करायलाच हवी. पण त्यासोबतच इतरही काही चांगली कामं करायला हवीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला ‘उन्हाळ्याच्या सुट्टीतले कृतिकार्यक्रम’ याविषयीचे खाद्य पुरवले होते. त्यात परिसरातील काहींच्या मुलाखती, सेवा देणारे-घेणारे, लहानांसाठी शिबीर असे काही कृतिकार्यक्रम सुचवले होते. यातील बरेच कृतिकार्यक्रम काही संघांनी अतिशय उत्तमरित्या केले. आम्हाला खात्री आहे की हे कृतिकार्यक्रम करताना तुम्हाला मज्जा नक्कीच आली असेल परंतु सोबतच काही चांगले वाईट अनुभवही आले असतील. तर नेहमीप्रमाणे तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला पाठवण्यास विसरू नका. तसेच तुमच्यापैकी काहींनी आपापल्या ठिकाणी वैयक्तिक कृती केल्या असतील तर तेही आम्हाला नक्की पाठवा.
सुट्टीमुळे काही संघ विस्कळीत झाले असण्याची शक्यता आहे पण आता शाळा सुरु झाली की संघही नियमित सुरु होतील. काहींच्या संघात नवीन मुलेही येतील तर त्यांना कुमार निर्माण समजावून सांगणे आणि आपल्या संघात सामावून घेणे हे आता तुमचे कर्तव्य आहे.
मित्रांनो, या भरारीत तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे, ते म्हणजे मुलांनीच मुलांसाठी आयोजित करायचे ‘मुलांचे गेटटूगेदर’! आता यात ‘मुलांचे’ असं जरी म्हटलं असेल तरी त्यात मुलीही आहेत बरं का! तर या गेटटूगेदर विषयी अधिक माहिती या भरारीत दिलेली आहे, ती नक्की आणि न विसरता वाचा. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला ही गेटटूगेदरची कल्पना नक्कीच आवडेल!

तुम्हाला माहितीये? नुकतीच निमंत्रकांची म्हणजेच तुमचा संघ सांभाळणारे ताई-दादा, सर-मॅडम यांची ‘द्वितीय निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा’ जळगाव व पुणे येथे पार पडली. या दोन दिवसांत वेगवेगळे सत्रं होते, सोबतच आम्ही खुप गाणी म्हटली, खेळ खेळलो, सिनेमा पहिला, खुप मज्जा केली. यात विशेष सांगायचं म्हणजे सर्व निमंत्रकांनी गेल्या ५ महिन्यांचा आपापल्या संघाचा प्रवास सगळ्यांसोबत शेअर केला. ते ऐकताना आम्हाला जाणवलं की तुमचे संघ, बैठका तसेच कृतिकार्यक्रम अतिशय उत्साहात सुरु आहेत.
आता लवकरच आपल्या सर्वांचा आवडता ऋतू म्हणजेच पावसाळा येईल आणि ही उन्हाळ्याची रखरख कुठल्या कुठे पळून जाईल. गेटटूगेदर विषयी वाचून आम्हाला लवकरात लवकर कळवा म्हणजे मी आणि शैलेश त्याप्रमाणे तुम्हा सर्वांना भेटायला येऊ आणि नेहमीप्रमणे खुप धम्माल करू!
तर, येत्या पावसात सर्वांनी मनसोक्त भिजा आणि सोबत तब्येतीची काळजीही घ्या!
लवकरच भेटुया!
तुमचे
प्रणाली, शैलेश