Showing posts with label मुलांच्या लेखणीतून. Show all posts
Showing posts with label मुलांच्या लेखणीतून. Show all posts

Monday, 26 February 2018

मुलांच्या लेखणीतून


आमच्या गावची यात्रा!
आमच्या संघाचे नाव ‘उडान’ आहे. १८-११-१७ रोजी शनिवारी आमची बैठक झाली. येणाऱ्या शुक्रवारी आमच्या गावात यात्रा
भरणार होती. यात्रेत आमाले काहीतरी करायचं होतं. बैठकीत आम्ही ठरवलं की, आपण यात्रेत येणाऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करू. आणि गोपालने सांगलं की यात्रेत खुप कचरा होतो, तो होऊ नये म्हणून आपण यात्रेत कचराकुंड्या ठेवू. मग आम्ही सर्व तयारीला लागलो.
पुन्हा बुधवारी आम्ही तयारीसाठी छोटी मिटिंग घेतली.
यात्रेत पाणपोई लावण्यासाठी आम्ही फायबरच्या मोठ्या तीन टाक्या स्वच्छ पाण्याने एका मोक्याच्या जागी भरून ठेवल्या. प्रत्येकाकडून एक-एक ग्लास असे १०-१२ ग्लास जमा केले. शाळेतला एक टेबल नेऊन त्या टेबलावर पाणी वाटप केलं.
शाळेत असणाऱ्या विध्यार्थी हजेरीतले कोरे पानं कापून एक हजेरी तयार केली. दोन-दोन मुलांची दोन तास अशी पाणी वाटण्याची ड्युटी लावली कारण सर्वांना यात्रेत फिरायला पण वेळ मिळायला पाहिजे.
सर्वांनी दोन-दोन तास पाणी वाटायचं काम व्यवस्थित केलं. आमच्या शाळेत आम्ही गॅदरिंगच्या वेळेस बनवलेलं बॅनर होतं. आम्ही ते बाहेर काढलं. आमच्या व गावकऱ्यांच्या तर्फे जलसेवा असं दादांनी एका कार्डशीटवर लिहिलं अ आम्ही ते त्या बॅनरवर लावलं.
आम्ही यात्रेत जागोजागी कचराकुंड्या पण ठेवल्या होत्या. दादांनी आम्हाला किराणा दुकानातून पुठ्ठे आणून दिले होते. आम्ही ते पुठ्ठे चिकटपट्टीने पक्के चिकटवून त्यांचे बॉक्स तयार केले. त्यावर ‘कुमार निर्माण – उडान गट’ व ‘कचरापेटी’ असं दादांकडून लिहून त्या १२ कचराकुंड्या यात्रेत सर्वदूर ठेवल्या.
यात्रेत दोन दिवस आम्ही खुप लोकांना पाणी पाजलं व आमच्या कचराकुंड्यांमुळे यावर्षी यात्रेत कचरापण कमी झाला.
दीक्षा जगदेव इंगळे
निमंत्रक: मंगेश ढेंगे, मुक्ताईनगर
आमची फन फेअर!
आम्हा मुलांना एक फन फेअर करायची खुप इच्छा होती म्हणून आम्ही फन फेअर करायची ठरवली. त्यातून मिळणारे पैसे आम्ही अंध शाळेला द्यायचे ठरवले. डिसेंबरमध्ये अडचण असल्याने आम्ही २६ नोव्हेंबरला फन फेअर करायची ठरवली. त्यासाठी सर्वांची परवानगी घेतली. आम्ही जय्यत तयारी केली. तीन दिवस आधी प्रत्येक बिल्डिंगमध्ये पोस्टर्स लावले. अखेर तो दिवस आला. फन फेअर संध्याकाळी ६.३० ला चालू होणार होतं. आम्ही ४ वाजताच खुर्च्या मांडल्या व तयारी केली. ६ वाजता तयार होऊन आम्ही परत आलो व सगळे सामान आणले. मी भेळ बनवत होतो. ६.३० वाजले. आत येणारा पहिला मुलगा सी विंगमधला रोनीत होता. सगळे त्याला स्वतःच्या स्टॉलवर बोलावू लागले. मग हळू-हळू अजून लोकं आली. दाराच्या सगळ्यात जवळ सुमेध होता. तो बटाटेवडे विकत होता, मग मी होतो, माझ्या बाजूला टेबलवर मिती-मधुरा व स्वानंद होते. मिती-मधुरा दाबेली विकत होत्या तर स्वानंद सॅन्डविच! त्याची आई सॅन्डविच खुप मस्त बनवते म्हणून मी त्याला आणायला विचारले होते आणि त्याने आणले. त्याच्यापुढे अर्णव खुप चविष्ट मिल्कशेक विकत होता. ईशा व अद्वैत खेळ खेळवत होते. अद्वैतचा खेळ लोकांनी खुप वेळ खेळला. आमच्या सगळ्यांचे खाण्याचे स्टॉल रात्री ८.३०ला संपले आणि आमची फन फेअरपण संपली. या फन फेअरमधुन आम्ही ३००० रु. जमवले. ते आम्ही अंधशाळेला दिले.
ईशान मराठे
निमंत्रक: प्रसन्न मराठे, पुणे
आम्ही गावात कचराकुंड्या ठेवल्या!
आम्ही एके दिवशी बैठकीला बसलेलो होतो आणि आमच्या गावाबद्दल चर्चा सुरु होती. आमचं गाव तसं छोटसंच आहे. तेव्हा गावात इकडे-तिकडे खुप कचरा पडलेला असतो यावर चर्चा सुरु झाली. मग गावातील कोणकोणत्या जागी जास्त कचरा पडलेला असतो यावरपण आमची चर्चा झाली. मग आम्ही ठरवलं की गावातल्या दुकानांसमोर काही कचराकुंड्या ठेवायच्या. मग कशाप्रकारच्या कचराकुंड्या ठेवाव्यात यावर आम्ही बोलत असताना संघातील एक जण म्हटला की प्लास्टिकच्या कचराकुंड्याचा विचार केला तर एका कचराकुंडीसाठी ३००-४०० रु. लागतील तर ते पैसे कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला. मग आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना जाऊन भेटलो आणि आमची कल्पना आणि आमच्यात झालेली चर्चा त्यांना सांगितली आणि आमची अडचणपण सांगितली. तेवढ्यात सर म्हणाले, “अरे! शाळेत रिकामे खोके पडलेले आहेत. त्यापासून तुम्ही कचराकुंड्या तयार करू शकता.”
मग काय, आम्हाला भारीच आयडिया मिळाली. मग आमच्या संघातील रोहन व मयुरने मोठमोठे ६-७ खोके आणले. त्यावर आम्ही ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे!’, ‘कुमार निर्माण – भराडीची भरारी गट’ असं लिहिलं. ठरल्याप्रमाणे आम्ही गावातील काही दुकानांच्यासमोर त्या कचराकुंड्या ठेवल्या आणि लोकांना त्यात कचरा टाकण्याची विनंतीपण केली.
निमंत्रक: समाधान ठाकरे, भराडी
आम्ही पाऊस मोजला!
एका बैठकीत चर्चा करत असताना आमचा पाण्याचा विषय निघाला. कारण गावाकडे तसेच एकंदरीत मराठवाड्यात पाण्याची समस्या खुपच गंभीर आहे. मग आम्ही पाण्यासंबंधी सर्व बाजूंनी चर्चा सुरु केली. नंतर आमच्या संघातील वैष्णवीने हिने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बद्दल मुलांना माहिती सांगितली. मग आम्ही त्याबद्दल चर्चा केली. पण आम्हाला याविषयी सखोल माहिती नव्हती म्हणून आम्ही पुरेशी माहिती जमवून पुढच्या बैठकीत या विषयावर चर्चा करायची असं ठरवलं.
आम्ही पुढच्या बैठकीला जमलो तेव्हा आम्ही सुरुवातीला खेळ खेळलो. मग आमच्या निमंत्रक दादांनी आम्हाला ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ संबंधीचे काही विडीयो दाखवले. ते बघताना आम्हाला खुप प्रश्न पडले, त्यावर आम्ही भरपूर चर्चा केली. आणि मग आम्हाला हा ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा  प्रयोग करायची उत्सुकता लागली.  हा प्रयोग संघातील एका मुलीच्या छतावर करायचं ठरलं.
आम्ही बैठकीला येण्याआधी याबद्दल बराच अभ्यास केला होता. एक छोटासा प्रयोग करून गावातील लोकांत पाण्याचे महत्त्व व ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ या संकल्पनेची जनजागृती करायची असं ठरलं.
पुढच्या बैठकीत दादांनी आम्हाला एक विडीयो दाखवला ज्यात पाऊस मोजण्याची एक सोपी पद्धत दाखवली होती. ते बघितल्यावर आम्ही तो प्रयोग करायचं ठरवलं. त्यासाठी काय काय साहित्य लागेल याची यादीपण बनवली. त्यामध्ये रिकाम्या पाणी बॉटल, मोजपट्टी (स्केल), चिकटपट्टी, कात्री अशी यादी तयार झाली.
दुसऱ्या दिवशी यादीप्रमाणे सर्व साहित्य घेऊन आम्ही एकत्र जमलो. साहित्य व्यवस्थित मांडून घेतलं आणि पाऊस मोजण्यासाठीचं
छोटसं यंत्र बनवायला सुरुवात केली. आम्ही २ छोटे यंत्र बनवले आणि संघातील दोघांच्या घराच्या छतावर बसवायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही आरती आणि रेणुकाच्या घराची निवड केली. त्यानुसार आम्ही ते यंत्र बसवलं. नंतर  आम्ही दोन गट केले. एक गट आरतीच्या घरावर बसवलेल्या यंत्रामधील पाऊस मोजायचा आणि दुसरा गट रेणुकाच्या घरावर बसवलेल्या यंत्रामधील पाऊस मोजायचा. आमच्या दोन्ही गटांनी पुढचे चार-पाच दिवस रोज सकाळी जाऊन बॉटलमधील पाण्याचे प्रमाण मोजले आणि त्याचे नीट निरीक्षण केले. संघातील हनुमंत व अभिजित यांनी दोन्ही ठिकाणचे मापं एकदम बरोबर घेतले. यातून आम्हाला समजलं की दोन दिवसांत १२ ते १६ मिमी पाऊस पडलेला आहे. म्हणजे पाऊस कमी पडला होता कारण तेव्हा पावसाळा संपत आला होता.
हा प्रयोग करताना आम्ही खुप मज्जा पण केली आणि पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा  प्रयोग नक्की करायचा असंही ठरवलं!
सदानंद चिंचकर, बेडकुची वाडी,बीड
आमची व्यसनमुक्तीची रॅली!
आम्ही शाळेत येत असताना रस्त्यावर काही लोक व्यसन करत होते. तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकत होते. आम्ही शाळेत आल्यावर
व्यसनमुक्तीची एक रॅली काढायचं ठरवलं. सर्वांनी त्याला होकार दिला. तसे आम्ही सरांना सांगितले. सर म्हणाले ही कल्पना उत्तम आहे, आपण मुख्याध्यापकांना याविषयी विचारले पाहिजे. मग आम्ही त्यांना विचारले, त्यांनीही आम्हाला परवानगी दिली.
आमच्या संघातील कौस्तुभ म्हणाला की “आपण रॅली २६ जानेवारीला काढली पाहिजे कारण त्यादिवशी उत्साह जास्त असतो.” अनिकेतने कल्पना दिली की आपण व्यसनमुक्तीबद्दल घोषवाक्ये बनवली पाहिजेत. ‘घोषवाक्ये बनवायची कशावर?’, आम्हाला प्रश्न पडला. तेवढ्यात शुभमने अतिशय उत्तम कल्पना सुचवली. ती अशी की, ‘आपण ड्रॉइंग पेपरवर घोषवाक्ये लिहून घ्यावी अन त्याला मागून पुठ्ठा आणि काठी लावावी.’ मग आम्ही घोषवाक्ये बनवली. २५ जानेवारीला आम्ही बनवलेली सर्व घोषवाक्ये आणली व सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यात थोडाफार बदल केला.
२६ जानेवारीला आमची ही व्यसनमुक्तीची रॅली आंबेडकर चौकातून निघून व जुन्या मोंढ्यापासून एक फेरी करून शाळेत आली.
आम्ही गल्लीतून जात असताना व्यसनमुक्तीच्या घोषणा दिल्या व त्याद्वारे लोकांना समजावलं की व्यसन करू नका. सरांनी मुलांना रस्ता ओलांडण्यास मदत केली. ही आमची रॅली व्यवस्थितपणे पार पडली!
अनिकेत, कौस्तुभ व हेमचंद्र
निमंत्रक: निलेश राठोड, माजलगाव
आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा केला!
२६ जानेवारीच्या निमित्ताने आमच्या संघाच्या वस्तीत आम्ही मुलांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात आम्ही पालकांकारिता प्रदर्शनी भरवली होती. या प्रदर्शनीमध्ये आम्ही वर्षभर केलेल्या कृतिकार्यक्रमांचे फोटो, चित्रं, पोस्टर्स लावले होते. नंतर आम्ही भाषणं आणि काही सांस्कृतिक कार्यक्रमही पालकांसमोर सादर केले. यानंतर दादांच्या मदतीने कुमार निर्माणमधुन भेट मिळालेले फास्टर फेणेची पुस्तकं आणि कौतुकपत्र आम्हाला आमच्या पालकांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी वस्तीतील सर्व पालकांनी चांगली उपस्थिती दर्शविली आणि प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसंच जी जुनी मुले संघ सोडून गेली होती त्यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. मग सर्वांना खाऊ दिला.
या कार्यक्रमासाठी आम्ही पहिल्यांदाच रस्त्यावरील सर्व परिसर स्वतःच झाडून स्वच्छ केला आणि बसण्याकरिता घरून ताडपत्री वैगरे आणून व्यवस्था केली. हे करताना आम्ही सर्वांनी खुप धम्माल केली.
निमंत्रक: नितीन कायरकर, नागपूर

Thursday, 31 August 2017

मुलांच्या लेखणीतून

भरारी गट, जळगाव
23 जुलैला गटाची पहिली सभा भरडीला शाळेच्या प्रांगणात घेण्यात आली; यात प्रथम लोकशाही फद्धतीने गट प्रमुख यांची निवड करण्यात आली. नंतर शिक्षकांच्या हातात पेपर होता त्यातल्या डोकलाम मुद्द्यावरून भारत आणि चीन यांच्यात युद्धजन्य परिस्थिती अशी बातमी होती. मुलांनी याच बातमीचा धागा धरून आपण चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला तर असा चर्चेचा विषय समोर आला. सरांनी सांगितले चिनी वस्तूवर बहिष्कार टाकल्याने काय होईल ?
आमच्यात चर्चा सुरू झाली. ‘चिनी वस्तू आपण विकत घेतो

त्यामुळे त्या देशातील उद्योगांना पैसा मिळून त्यांची भरभराट होते. त्यांना आपल्याकडून वस्तूच्या मोबदल्यात पैसा मिळतो आणि त्या पैशाचा उपोयग करून ते आपल्या देशासोबत भांडण करतात जर आपण त्या वस्तू घेतल्या नाहीतर त्यांच्याकडे जास्तीचे पैसे येणार नाहीत आणि त्याची आपल्या सोबत भांडण करणे कमी होईल आणि सर्व भारतीयांनी चीनी वस्तू वस्तू घेणे बंद केले तर ते आपल्या वाट्याला येणार नाही.’ मग सरांनी सांगितले अशा कोणत्या चिनी वस्तूवर बहिष्कार टाकणार? आणि गरज भागविण्यासाठी त्याऐवजी कोणत्या वस्तू वापरणार? असा सरांनी आम्हाला प्रश्न केला. याची पुढील मिटींग पर्यंत यादी करायचे ठरले. सोबतच आम्ही एक घोषवाक्य बनवले; ‘सुनो मेरे भाई, सून मेरी बहना, कभी न लेना मेड इन चाइना!’
मयूर जंजाळ, ७वी

मोहर गट, लांजा

आम्ही जेव्हा पोस्ट ऑफिसला भेट द्यायला गेलो तेव्हा रस्त्याच्या कडेला कचरा साठला आणि पडला होता. पोस्ट ऑफिसला भेट देऊन आल्यानंतर आम्ही ‘कचरा’ या विषयावर चर्चा केली. सरांनी विचारलं, “कचऱ्यात नेमक्या कोणकोणत्या वस्तू येतात?”, मुले म्हणाली, “खाऊचे कागद, पिशव्या, बाटल्या.”
सरांनी आम्हाला कचऱ्याविषयीचा विडीयो दाखवला. त्यामध्ये पशु-प्राण्यांनी कचरा म्हणजेच पिशव्या खाल्ल्या होत्या आणि ते २ ते ३ दिवसांत मरण पावले. तसेच पक्ष्यांनीही पिशव्या खाल्ल्या. तेदेखील मृत्युमुखी पाडले.
या प्रकारच्या कचऱ्याच्या वापरामुळे कोणकोणते फायदे व नुकसान होते यावर आता आम्ही चर्चा करत आहोत.
निमंत्रक: सुहास शिगम
आम्हाला सापडलेल्या चिमणीची गोष्ट – शिवाजी नगर गट, नागपूर
काल आम्ही सगळे खेळत असतांना वैष्णवीला एक चिमणीच पिल्लू दिसलं. त्याला पंख फुटलेले नव्हते आणि डोळे पण उघडायचे होते. तो छोटंसं पिल्लू होतं म्हणून आम्ही त्याला घरी आणलं. भूमीने एक पानाचा घोसला बनवला होत. त्या घोसल्यामध्ये आम्ही पान  टाकलं आणि आम्ही त्या पिल्लाला घोसल्यामध्ये ठेवलं. मग त्या पिल्लाच्या आईने तिच्या तोंडात चारा टाकतांना आम्ही लपून पाहत होतो. मग आम्ही पाणी पाजलं. एक मुलगा मात्र त्याला घेऊन गेला. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला ते परत मागितलं आणि पुन्हा घरी आणलं. मग त्याला आम्ही तुळशीच्या झाडावर ठेवलं. आम्ही कामात होतो म्हणून एका मुलीजवळ दिलं. नंतर आम्ही त्याला आमच्या घराच्या बाजूच्या गल्लीत ठेवलं. तेव्हा तिथं चिमण्या आल्या त्या छोट्याश्या पिल्लासमोर ते पिल्लू आलं. तेव्हा चिमणी त्यांच्या जवळ जात होती. तेव्हा त्या चिमण्या पळून जायच्या. मग आम्ही त्या पिल्लाला तिथून उचललं. आम्ही नवीन घोसला बनवला. त्या घोसल्याला तुळशी पाशी ठेवलं. त्या पिल्लाची मम्मी तिथे होती. मग आम्ही त्या पिल्लाच्या मम्मीला हाकलल. त्या पिल्लाची मम्मी येत नव्हती. मग काल आभाळ आलं आणि मग जोरात पाऊस आला. मग त्या पिल्लाला जिथे पाऊस येत नव्हता. तिथं ठेवलं मग दुसऱ्या दिवशी त्या पिल्लाला दिसलं नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी पासून त्या पिल्लाला दिसत होत. मग ते चिमणीच्यासोबत या झाडावरून त्या झाडावर उडत होतं आणि अश्या प्रकारे आम्ही त्या पिल्लाचा जीव वाचवला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सर आल्यावर आम्ही सरांना ती चिमणी दाखवली व चिमणीची गोष्ट सांगितली म्हणून ती गोष्ट सरांनी आम्हाला लिहायला सांगतली व आम्ही ती लिहिली. आम्हाला जीव वाचावल्याचा खुप आनंद झाला.
निमंत्रक: नितीन कायरकर
 विशेष
उबंटू गट, पुणे


उबंटू गटाला निमंत्रकाने चर्चायुक्त अभ्यास दिला होता. ‘तुमच्यासाठी आता नवीन वर्ग तयार होत आहेत, त्यात तुम्हाला भिंतींवर काय हवे ते लिहून द्या.’ त्यावर गटातील मुलांनी वेगवेगळी मते दिली. बहुतांश मुलांनी आम्हाला वर्गात देवी- देवतांचे फोटो हवेत, म्हणजे परीक्षेच्यावेळी आशिर्वाद घेता येतील. सोबतच थोर व्यक्तींचे फोटो लावा असेही काहींचे मत आले. मग गटात खुली चर्चा व तोंडी मतेही मागितली गेली. तेव्हा एक मुलगा म्हटला की शिवाजी महाराजांचा फोटो लावा, लगेच दुसरा म्हटला आंबेडकरांचा लावा, तिसरा अजून काहीतरी म्हटला... आणि असे चालूच राहिले. मग गटातील वाद टाळण्यासाठी कृती ठरली की, काय लावायचे व का लावायचे याचे कारण लिहिणे. ज्याचे योग्य वाटेल ते ठरवू. त्यातील काही निवडक प्रतिसाद इथे देत आहोत.




Friday, 30 June 2017

मुलांच्या लेखणीतून

. भरारी गट – भराडी, जळगाव

नेहमीप्रमाणे ठरलेल्या दिवशी शाळेच्या अंगणात आमची कुमार निर्माणची मिटींग चालू होती. सकाळी कुमार निर्माणच्या मुलांव्यतिरिक्त इतर मुले व पालक यांची ये-जा शाळेत सुरू होती. आम्हाला वाटलं काय आहे? बघण्यासाठी म्हणून आम्ही ज्या ठिकाणी पालक आपल्या मुलांना घेऊन जात होते त्या खोलीकडे गेलो. तेथे आम्हाला दिसले की गावातल्या लहान मुलांना पल्स पोलिओ लस देण्याची मोहीम सुरु आहे. मग त्या ठिकाणी आम्ही आमच्या सरांसोबत आणि अंगणवाडीच्या ताईसोबत चर्चा केली. पल्स पोलिओ म्हणजे काय? ते देण्याचे फायदे काय? याला राष्ट्रीय कार्यक्रम का म्हणतात? हा कार्यक्रम करताना ताईंना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. ताईंनी सर्वं विषयांवर सविस्तर चर्चा केली. ताईंनी सांगितलं की आज जी मुलं येतील त्यांना इथे औषध द्यायचं आणि जी इथे येणार नाही त्यांना घरी जाऊन औषध द्यायचं. गटातील सर्व सदस्यांनी ठरवलं की आज आपण ताईंच्या कामात हातभार लावून पल्स पोलिओ मोहिमेत सहभागी होऊया. आज हा कृतिकार्यक्रम करायचं ठरलं. त्यात नम्रता व  जगृती म्हणाल्या की गावातील मुले येतील परंतु गावाच्या बाहेर आलेले धनगर लोक जे मेंढपाळ आहेत त्यांच्या मुलांचे काय? तर ऋषिकेश व वैभव म्हणाले आपल्या परिसरात काठेवाड लोकं गायी शेतात बसवतात त्यांच्याकडे देखील छोटी मुले आहेत त्यांच्या साठी काय करता येईल? चर्चा झाली आणि गाव छोटेसे असल्याने आम्ही दोन दोन सदस्यांचे गट तयार केले आणि प्रत्येक गटाने गल्ल्या वाटून घेतल्या. गटातील मोठया सदस्यांनी धनगर वाडा व काठेवाड वस्ती गाठली. त्यांना पल्स पोलिओचे महत्त्व समजावून सांगितले व त्यांच्या पालकांना व बाळांना शाळेत आणले व औषध दिले. तर गावातील कुमार निर्माणच्या सदस्यांनी गावातील सर्व बाळांना व त्यांच्या पालकांना  शाळेत बोलावून औषध दिले त्यामुळे अंगणवाडीच्या ताईंच्या कामात पण मदत झाली व लाभार्थ्यांनाही मदत झाली. आम्ही केलेल्या कामाचे कौतुक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सुपरवायजर ताई या सर्वांनी केले. आमच्या छोट्या मदतीमुळे गावातील सर्व बाळांना महत्त्वाची लस मिळाली याचा आम्हाला खूप आनंद झाला. नंतर आम्ही सर्व आपापल्या घरी गेलो.
गट निमंत्रक: समाधान ठाकरे
 . किलबिल कट्टा, भुसावळ, जळगाव
२८ मे ला म्हणजेच रविवारी आमच्या किलबिल कट्ट्याने निसर्ग सहल आयोजित केली होती. मी सकाळी लवकरच उठून तयार झाली आणि माझ्या पप्पांनी सकाळी ६ वाजताच मला सहलीच्या ठिकाणी सोडलं. तिथे माझे सर्व मित्र-मैत्रिणी, शैला ताई, व इतर जणही जमले होते. मग आम्ही झाडांच्या बिया उचलायला सुरुवात केली. बिया उचलताना ताईंनी आम्हाला जवळ-जवळ २०-२५ झाडांची माहिती दिली. जसे, बहावा, रिठा, पिंपळ, जांभूळ, वड ई. यासोबतच तातोडा, कोकिळा हे पक्षी सुद्धा आम्ही पाहिले.
हे काम करताना आम्ही खूप धम्माल पण केली. बेलफळे एकमेकांत वाटावाटी करून खाल्ली. आम्हाला खरी मजा आली ती मुंग्यांनी झाडावर बांधलेल्या घरट्यांना पाहून. कुणीतरी अशीच एक घरटं असलेली फांदी तोडली तर क्षणात हज्जारो मुंग्या बाहेर आल्या आणि आम्ही सर्वजण लांब पळालो. नंतर आम्ही बहावाच्या शेंगांचा खुळखुळा म्हणून वाजवून धम्माल केली.
नंतर आम्ही फिरत फिरत जुन्या मार्केटमध्ये जाऊन वडापाव खाल्ला. जावळे सरांनी आम्हाला इंग्रजी चिंचा खायला दिल्या. मग आम्ही चांदणी गार्डनमध्ये जाऊन भंडारी सरांसोबत विविध खेळ खेळलो. नंतर आम्ही सर्वांनी मिळून पोहे खाल्ले आणि खूप गप्पा मारल्या.
आता या जमा केलेल्या बियांचे आम्ही बियांचे लाडू म्हणजेच सीडबॉल बनवणार आहेत आणि ते पावसाळ्यात आजूबाजूला टाकणार आहे. सीडबॉल म्हणजे एक बी घ्यायची आणि तीला मध्ये टाकून आजूबाजूने माती लावून त्याचा बॉल किंवा लाडू सारखा आकार बनवायचा.
आम्ही मस्तपैकी निसर्ग पहिला. मला सकाळची सहल खूप खूप आवडली. आणि परत अशा सहलीला जायला मला नक्की आवडेल.
श्रद्धा रमेश प्रधान
निमंत्रक: शैला सावंत
 . मलजल प्रक्रिया केंद्राला भेट - मी माणूस गट, नाशिक

१९-०३-१७ रोजी आम्ही मलजल प्रक्रिया केंद्राला भेट दिली. १४ मार्च ला वर्तमानपत्रात मलजल प्रक्रिया केंद्राला भेट देण्याची बातमी होती. आमच्या गटातील एकीने ती बातमी वाचून सर्वांना विचारले तर १५ जणांनी होकार दिला मग आम्ही आमची नोंदणी केली. ठरलेल्या दिवशी सगळे आपल्या पालकांसोबत ९.०० वाजता तापोवनला पोचले. तिथे एका सरांनी या कार्यक्रमाची आम्हाला माहिती दिली. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या काकांनी एक प्रेझेन्टेशन दाखवलं आणि आम्हाला सांगितलं की या कार्यक्रमाचं आयोजन ‘जागतिक जलदिना’निमित्त केलं आहे. मग त्यांनी आम्हाला प्लांटवर नेलं. सगळ्यांत पहिले इनलेट चेंबर दाखवलं. इथून सांडपाणी सोडल्या जातं, मग स्क्रीन चेंबर मध्ये जातं. तिथे एक मशीन आहे जिथे तरंगणाऱ्या वस्तू जसे, प्लस्टिकच्या पिशव्या, भाज्यांचा कचरा ई. वेगळं होतं. मग पुढे ते पाणी सिट चेंबर आणि मग बायपास चेंबरमध्ये जातं. इथे जड पदार्थ तुरटी टाकून खाली बसवतात. नंतर ते १२ पाईप्स द्वारे जातात. इथे त्यातल्या जंतूंची वाढ होते आणि मिथेन वायू तयार होतो. या बायपास चेंबरमधलं पाणी एरिएशन साठी एरिएटर मध्ये पाठवतात. तिथे टरबाईन फिरते ज्याने पाण्यातला कार्बन हवेत मिसळतो आणि हवेतलं ऑक्सिजन पाण्यात मिसळतं. त्यानंतर जे पाण्यातले कण होते त्यांना ड्राईंग बेडवर १५ दिवस ठेवतात, ते वाळवतात आणि त्याचं खत तयार होतं जे शेतीसाठी वापरतात. मग आम्ही पॉलिथीन पाँड पहिला. तिथे गेल्यावर सांडपाण्याचा वास कमी झाला होता. मग पाण्याला क्लोरीनेशन युनिटमध्ये त्यातले बॅक्तेरीया मारायला पाठवतात. आता पाणी भरपूर स्वच्छ झालेलं असतं पण पिण्याइतकं नाही. आता हे पाणी नदीत सोडतात. मग आम्हाला बायो-इंजिन रूम दाखवली. गॅस चेंबरमध्ये मिथेन वायू साठवलेला असतो ज्याची इथे वीजनिर्मिती होते. त्यानंतर तिथल्या सगळ्या तज्ञांनी आम्हाला माहिती दिली. आणि आम्ही त्यांना आमच्या शंका विचारल्या. मग आम्ही थोडावेळ खेळलो आणि घरी गेलो. तिथून आल्यावर आम्हाला वाटलं की आपण किती पाणी वाया घालवतो आणि मग आम्ही ठरवलं की पाणी वाया नाही घालवणार. नुकताच होळीचा सण झाला होता आणि ते रंगाचं पाणी त्यातील केमिकलमुळे अजूनही तसंच होतं. मग आम्ही केमिकलचे रंग वापरायचे नाहीत असंही ठरवलं. शेवटी त्या काकांनी आम्हाला एक-एक तुळशीचं रोपटं भेट दिलं.
- इंद्राणी
निमंत्रक: अजित टक्के
 . आम्ही पाहिलेला सूर्यास्त: उडान गट, भोटा, जळगाव
बुधवारी मी असाच रिकामा बसलो होतो. मोकळा वेळ होता. मला एकदम पश्चिमेकडे झुकलेला सूर्य दिसला आणि मनात एक भन्नाट आयडिया आली. मी घराजवळ राहणाऱ्या महेश, वैभव, मयूर व ज्ञानेश्वर यांना एकत्र केलं व आम्ही गावाबाहेरच्या मोकळ्या पटांगणाकडे फिरायला गेलो. सूर्य आता मावळत होता.

तिथे गेल्यावर बघतो तर काय? सूर्य एकदम लालबुंद दिसत होता. जणू सोन्याचा गोळा क्षितिजाच्या मागे लपत होता. आमच्यातल्या एकाला तर असं वाटलं की हे आकाश म्हणजे एखाद्या स्त्रीचा चेहरा आणि हा सूर्य म्हणजे त्या स्त्रीने लावलेली टिकली.
पण त्या सूर्याला पाहिल्यावर मनात असं आलं की सूर्यासारखी विशाल व अविश्वसनीय गोष्ट जर अस्ताला जाऊ शकते, तर आपण काय चीज आहोत? असं पण वाटलं की या सूर्याला  नेऊन शोकेसमध्ये ठेवावा.
थोड्यावेळाने आमच्या शाळेतील अजून काही मुंला-मुलींचा गट तिथे आला. त्यांनापण कळालं की आम्ही सूर्यास्त पाहायला आलोय. आमच्यासोबत त्यांनीपण मनभरून सूर्य पहिला आणि कोणाकोणाला तो सूर्य कसा वाटतोय ते सांगितलं. मग काही वेळ आम्ही थांबलो आणि मन भरून सूर्य पाहून घरी परत आलो.
- मयूर तायडे
निमंत्रक: मंगेश ढेंगे
  . एकता गट, सासवड, पुणे
कुमार निर्माणचा एकता गट सासवड यांच्या झालेल्या बैठकीत अनेक प्रश्नांबद्दल चर्चा झाली होती. त्यातील एक प्रश्न निवडून त्याबद्दल काहीतरी करायचं असं मुलांनी ठरवलं होतं.
या मुलाच्या कॉलनी मध्ये लोक कचरा एका मोकळ्या जागेवर टाकत होते. गटातील बऱ्याच मुलांच्या घरातील कचरा देखील तेथेच टाकल्या जात होता. मुलांनी हा प्रश्न निवडून त्यावर कृती करायची ठरवलं. लोक कचरा टाकतात त्या ठिकाणी पाटी लावायची असं मुलांनी ठरवलं. पण साध्या पाट्या असलेल्या ठिकाणी लोक अजून जास्त कचरा टाकतात हे मुलांना माहिती होतं. मग मुलांनी तेथे पुणेरी पाटी लावायची असं ठरवलं. ठरल्या प्रमाणे मुलांनी पुणेरी पाट्या बनवल्या. “येथे फक्त अतिहुशार लोक कचरा टाकतात” ‘येथे मूर्ख लोक कचरा टाकतात” अशा या पाट्या होत्या. मुलांनी या पाट्या लोक कचरा टाकतात तेथे लावल्या. मुलं परत परत जाऊन पाट्या योग्य ठिकाणी आहेत का हे बघत होते. एके दिवशी गटातील लहान मुलांना या पाट्या गायब असलेल्या दिसल्या. मुलांनी लगेच नवीन पाट्या आणून तेथे लावल्या.हळूहळू लोकांनी तेथे कचरा टाकणं बंद केलं. जिथे लोक कचरा टाकत ती जागा ज्या माणसाची होती त्यांना हे बघून खूप आनंद झाला. त्यांनी मुलां-मुलींना शाबासकी दिली. आता पर्यंत जो कचरा तिथे जमा झाला होता तो त्यांनी जाळून टाकला.
या मुलांच्या कॉलनी मध्ये कचऱ्याची घंटा गाडी येते पण ती थोडी उशिरा येथे आणि तो पर्यंत सगळे लोक आपल्या कामावर निघून गेलेले असतात. त्यामुळे या घंटागाडीची वेळ बदलावी आणि एक कचराकुंडी बसवून द्यावी ही विनंती नगर पालिकेला करायची असं या मुलांनी ठरवलं. त्यानुसार एक अर्ज तयार करून ही मुलं त्यांच्या पालकांना घेऊन नगर पालिकेत पोहचली. पण त्या दिवशी संबंधीत अधिकारी उपस्थित नव्हते. मग ही मुलं-मुली नगर पालिकेतील विविध विभागांची माहिती घेऊन घरी परतली. नगर पालिकेतील अधिकाऱ्यांना गटातील मुला-मुलींनी कुमार निर्माणची माहिती देखील सांगितली. अर्ज पुन्हा नव्याने काही सुधारणा करून लिहायचा आणि परत एकदा नगर पालिकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना द्यायचा असं या मुला-मुलींनी ठरवलंय.
गट निमंत्रक – चंद्रकांत घारमाळकर


Wednesday, 1 March 2017

मुलांच्या लेखणीतून

बैठक वृत्तांतजागृती गट, डोमरी, बीड.
वार: गुरुवार
दि. ०९-०२-२०१७
दिवाळी नंतर बऱ्याच बैठका झाल्या पण ही बैठक जरा खास होती. या बैठकीचा उद्देश्यसुद्धा जरा वेगळाच होता. गटाचे काम हे स्थिर झाले होते. ते नव्याने चालू करण्यासाठीची ही बैठक. सुरुवातीला गाणे म्हणून या बैठकीची सुरुवात झाली.
उन्हाळी सुट्ट्या लागण्यासाठी अवघा दीड महिना उरला आहे. एवढ्या कमी वेळेत जास्त व कल्पक कामे काय करायचीत? यावर चर्चा सुरु झाली. बरेचसे नवीन कल्पक उपक्रम गटातील विद्यार्थ्यांनी सुचविण्यास सुरुवात झाली. त्यापैकी काही निवडक उपक्रम खालीलप्रमाणे
· गुरुकुलातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. अभ्यास करावा का वाटत नाही ? हे गटातील विद्यार्थ्यांनी शोधून म्हणजे अभ्यास न करण्याचे कारण शोधून त्यावर योग्य असे उपाय सुचवायचे असं ठरवलं. त्याचबरोबर अभ्यास मनोरंजक वाटावा त्यासाठी काही खेळातून अभ्यास म्हणजे अभ्यास हा विद्यार्थ्यांना आनंदी वाटू लागेल.
· गुरुकुलाच्या परिसरात पडलेल्या टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची थोडक्यात माहिती घेऊन त्या योग्य रित्या उपयोगात आणणे.
· गटातील विद्यार्थ्यांच्या माध्यमाने शैक्षणिक साहित्य गोळा करून गुरुकुलाच्या परिसरामधील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करणे.
· जयंती किंवा इतर वेळेस सगळ्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या विविध सपर्धा घेणे व नवीन उपक्रम घेणे.
· जे भारतीय खेळ आहेत. उदा. कुस्ती, खो-खो, सूरपारंब्या, कबड्डी इ. हे थोडक्यात कमी प्रमाणात खेळले जातात. शिवजयंतीच्या निमित्ताने गटातील विद्यार्थ्याचे तसेच सगळ्या गुरुकुलातील मुलांचे व जवळच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे खेळ घेणे/ खेळणे.
· गटबैठक ही उत्तम होण्यासाठी व प्रत्येक बैठकीतून काहीतरी शिकायला मिळण्यासाठी बैठकीत नवीन उपक्रम म्हणजे, एखादा विषय देऊन त्यावर चर्चा घेणे, अवांतर वाचन करणे, नवीन इंटरनेटवरील गोष्टींची माहिती, नाट्यछटा इ. सारखे उपक्रम बैठकीत घेणे.
· यांसारखे उपक्रम गट बैठकीत विद्यार्थ्यांमार्फत सुचविण्यात आले.
निमंत्रक: रज्जाक  पठाण

उडान गट, भोटा, जळगाव
आमच्या गटाचे नाव उडानआहे. हा गट मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा या गावातील आहे. आम्ही सर्वजण एकमेकांशी प्रेमाने वागतो, बोलतो आणि कामही करतो. सर्वजण आपल्याजवळ असलेल्या आठवणी आणि इतर गोष्टी शेअर करतात. आम्ही आमच्या गटासाठी उडान’ गट, या नावाने बिल्ला देखील बनवला आहे व त्यामागे आपले नाव व नंबर टाकलेला आहे. दर आठवड्याला होण्याऱ्या मिटींगला आम्ही सर्वजण आपापले बिल्ले लावून येत असतो.
एक दिवस वाढणारे ऊन पाहून आमच्या गटातील वैभवने मिटींगमध्ये सुचवले की, आपण शालेय परिसरात येणाऱ्या पक्षांसाठी पाणी व धान्य ठेवू, मग आम्ही त्यावर चर्चा केली आणि सर्वांनी यासाठी सहमती दिली. मग आम्ही सर्वजण कामाला लागलो.
मग आम्ही पक्षांसाठी पाणी ठेवायला म्हणून काहीतरी बनवावे अशी चर्चा केली आणि त्यासाठी इंटरनेटची मदत घ्यायची ठरवली. त्यावर आम्हाला पक्षी पाणी पित असलेल्या एका चित्र सापडले आणि त्यातील कल्पना आम्हाला आवडली. नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे आम्हीपण आपापल्या घरून तेलाच्या रिकाम्या कॅन जरा वेगळ्या प्रकारे कापून शाळेतील परिसरातल्या झाडावर लावल्या. काही कॅन गावातील पक्षी येणाऱ्या झाडावर पण ठेवल्या व काही भांड्यांत तांदूळ आणि ज्वारीचे दाणे टाकले.
आमच्या गटातील काही मुलं रोज या भांड्यांत दररोज पाणी व दाणे टाकतात.
या भांड्याजवळ जमा होऊन जेव्हा आम्ही पक्ष्यांना पाणी पिताना, तांदळाचे ज्वारीचे दाणे खाताना, किलबिल करताना पाहतो तेव्हा आम्हाला खुप खुप आनंद होत!
-मयूर तायडे, ९वी,
निमंत्रक: मंगेश डेंगे



‘मी माणूसगट स्मशानभूमी भेट, नाशिक
आम्हाला स्मशानात जाण्याचं कसं सुचलं? आम्ही एकदा अनाथआश्रमात जावे का या विषयावर बोलत असताना आमच्या गटातील माही म्हणाली की, “आपण स्मशानात जाऊया का?” मग सर्वेश बोलला, “मी नाही येणार, मला भीती वाटते.आमचं कसं ठरलं? माहीने विषय काढला आणि मग सर्वांनी त्यावर चर्चा केली आणि पालकांना विचारले तर आमच्या पालकांचे प्रोत्साहन चांगले होते. आणि आम्ही ८ ते १ या वेळेत गेलो. ८ वाजता  सर्वांनी कपाळेश्वर मंदिरासमोर भेटण्याचे ठरवले आणि तिथपासून अमरधाम पर्यंत पायी गेलो. गंगेवर आम्ही सफेद रंगाचे गोल-गोल भाताचे पिंड पहिले. काकांनी आम्हाला सांगितले की एखादी व्यक्ती वारली की असं करतात.


नंतर आम्ही पुढे चालत निघालो तिथे एक काका १० रु. ला २ वडापाव विकत होते. माहीचे तिकडे लक्ष गेले. तिने काकांना जेव्हा वडापाव घेण्याचा आग्रह केला तिला तेव्हा काकांनी आधी एक प्रश्न केला, “तो माणूस १० रु. ला २ वडापाव का विकतोय?” ती बोलली की त्याचा व्यापार व्हावा म्हणून. तर काकांनी सांगितले की गंगेवर खुप सारे लोकं येतात, त्यात काही गरीब आणि भिकारीही असतात. भिकारी किती पैसे देऊ शकतात, २-५ रु. तर मग ५रु. ला १ वडापाव मिळत असेल तर त्यांना त्यांची भूक भागवणं सोपं जातं.
मला तेथे जाऊन असं वाटलं की येथे राहणारी माणसं कित्ती साऱ्या लोकांना जाळतात त्यांची जाळल्यानंतर उरलेली हाडे बाजूला काढतात, मग एखाद्या दिवशी यांना भूत किंवा आत्मा दिसले नाही का कधी? मग आम्ही तिथली हाडे हाताळली आणि तिथल्या दादा आणि काकांना विचारले की तुम्हाला इथे कधी अमावास्येच्या दिवशी भूत-आत्मा दिसले नाही का?” तर ते म्हणले, “आम्ही इथे दिवसरात्र काम करतो, आम्हाला कसलीच भीती वाटत नाही. आपणच एक भूत असतो.
तिथे आम्ही एक वेगळ्या प्रकारचा प्राणी पहिला. त्याचं नाव कबडबिच्छूआहे असं तिथल्या काकांनी आम्हाला सांगितलं. त्यांनी सांगितलं की हा प्राणी माणसांना खातो. हे आमच्यासाठी अगदीच नवीन होतं.
पण मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की, तेथे एक आजोबा लाकूड फोडत होते आणि त्यांना कुणीही मदत करत नव्हतं. असं का? मी जाऊन त्यांना विचारलं, “आजोबा, तुम्ही हे लाकडं फोडता आहात, एवढा घाम गाळताय, कशासाठी?” त्यावर ते काही बोलले नाही, पण त्यांनी माझ्या हातात एक हाड बघितले व मला म्हणाले, “हे तु घरी घेऊन जाणार का? वा वा छान! जा जा घेऊन जा घरी!एवढे बोलून त्यांनी आपलं काम सुरु केलं.
आम्ही तिथे खेळलोसुद्धा आणि खुप मजाही केली आणि सोबतच आम्हाला खुप शिकायला मिळालं.
साक्षी,
गट निमंत्रक: अजित टक्के
मायाळू गट, सासवड, पुणे
आम्ही नेहमीप्रमाणे गेल्या रविवारी जमलो होतो. मग आम्ही सर्वजण एकत्र जमलो, लई खेळलो. मग सगळी पोरं म्हणाली की पुढच्या रविवारी काय करायचं? मग त्यावेळी ऋतिक म्हणाला की आपण आपल्या ग्राउंडवरचं गावात कापायचं. मग सगळीच म्हणाली की गवत कापू. पण आम्ही म्हणालो की पुढच्या रविवारी जाऊन काहीतरी करायचं, कारण पुढच्या रविवारी न्यू इयर २०१७ साजरा करायचा. मग सगळी पोरं म्हणली की करायचं तरी काय? सगळ्यांनी मिळून ठरवलं की सर्वांनी पैसे काढून भेळ आणायची. मग सगळ्यांनी मिळून १०-१० रुपये आणायचे.
ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे जमलो. जमल्यावर आम्ही गवत कापायला सुरुवात केली. आम्ही सगळ्यांनी जोमाने गवत काढायला सुरुवात केली. आम्ही सगळ्यांनी जोमाने गावात काढलं. सर्वांनी मिळून गवत काढल्यावर एका ठिकाणी गोळा करून ठेवलं. सर्व  ग्राउंड मोकळं झाल्यावर ग्राउंड स्वच्छ आणि सुंदर दिसल्यामुळे आम्हाला लई बरं वाटलं. मग आम्ही पैसे गोळा केल्यानंतर दोघेजण हॉटेल वर भेळ आणायला गेलो. आमचे सर्वांचे मिळून ९० रुपये गोळा झाले. ९० रुपयाची आम्ही भेळ आणली. भेळ घेऊन येताना आम्ही पाहिलं की सर्वजण आपली मान उंच करून भेळेची वाट पाहत होती. आणि छोटी छोटी लहान मुलं गोळा होऊन आपापली जागा धरून बसली होती. मग आम्ही भेळ आणल्यावर आम्ही सगळे गोल करून बसलो. भेळ सोडल्यावर व्यवस्थित कालवायला सुरुवात केली. त्यावेळी आमच्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं. मग आम्ही सगळ्यांनी भेळ खायला सुरुवात केली. आम्ही दोन मिनिटाच्या आत भेळ संपवली सुद्धा! त्यावेळी आम्ही नवीन वर्ष साजरा केलं. मग सगळं झाल्यावर आम्ही पुढच्या रविवारी काय करायचं ते ठरवायला सुरुवात केली. सर्व ठरल्यावर मुलं आपापल्या घरी गेली आणि आमचा सुंदर दिवस संपला.
चेतन, ६वी
निमंत्रक: निखील जगताप
भरारी गट, पहूर, जळगाव
आम्ही गटाची मिटिंग संपल्यावर क्लासमधून सर आणि सगळे मुलं गटातील एका मुलाच्या शेतात जायला निघालो.  जाताना आम्ही गोगडी रस्त्याने जाणाऱ्या रेल्वेलाईन वरून चाललो. त्यावरून चालताना खूप मजा आली. पुढे चालून आम्ही नदीत उतरलो. नदी पार करून थोड्याच अंतरावर त्याचं शेत होतं. त्यांनी त्यांच्या शेतात सिमेंटचे फार्म हाउस बांधले आहे. तिथे आम्ही औषधी फवारणी पंप पहिला. बाहेर येऊन सरांनी आम्हाला कागदी पिशवी कशी बनवायची ते शिकवले. नंतर टिकमने आम्ही सगळ्यांनी मिळून भातकंदाच्या झाडाचे भातकंदं काढले. ते काढतानाही मजा आली. ते काढून मग भाजण्यासाठी काड्या आणल्या, काहींनी भातकंदं कापून घेतले, काहींनी जाळ केला मग काढलेली भातकंदं भाजण्यास ठेवली आणि तोपर्यंत आम्ही शेणखतावर प्रक्रिया कशी केल्या जाते हे पहिले. भूषणने ते आम्हाला त्या टाकीत हात घालून दाखवलं. ते चहापत्तीप्रमाणे दिसत होतं. त्याने सांगितलं की शेणखताचा ढीग करून त्यावर मोटारने पाणी घातलं जातं. तो ढीग आम्ही काडीने खोदून पहिला तर त्यात काही किडे दिसले आणि तो ढीग कुजून गेला होता. शेणखताचे खूप फायदे आहेत. जसे की कमी खर्चात उपलब्धी, शेतीसाठी उपयुक्त, जमीन नापीक होत नाही, कुठल्याही प्रकारच्या पिकाला टाकू शकतो व आपापल्या शेतात सहज उपलब्ध असते.
मग नंतर आम्ही तेथून मोसंबीच्या झाडाकडे चालत गेलो. त्या झाडावर पिवळ्या खोक्यात औषध लाऊन भिस्कीट ठेवले होते; फळांना डास लागून नये म्हणून. पुढे जाऊन आम्ही ती मोसंबी खाल्ली. तेव्हा दादाने सांगितले की मोसंबीमध्ये BC व्हिटामिन असते, जामनेर तालुक्यात तुरळक प्रमाणात आढळते, तिचे 2 प्रकार असतात मोठी व लहान मोसंबी. मोठ्या लिंबूवर मोठ्या आणि लहान लिंबूवर लहान मोसंबीची कलम बांधली जाते. दादाने सांगितलेली माहिती समजून घेतल्यानंतर आम्ही एका झाडाखाली बसून फोटो काढले व तिथे बसलेलो असताना सरांनी एक प्रयोग केला. माचीसची काडी पेटवून, मोसंबीचे ताजे सालटे घेऊन त्याचा रस त्या पेटत्या काडीवर टाकला तेव्हा मोठा जाळ झाला. यावरून समजते की त्यात काहीतरी ज्वलनशील असलं पाहिजे. परत आल्यावर आम्ही ती भाजलेली भातकंदं खाल्ली. आदिवासीही हीच भातकंदं खातात. भातकंदापासून साबुदाणा कसा बनतो हे दादाने आम्हाला सांगितले. त्याने सांगितले की सडवून त्यावर आलेल्या थरीपासून साबुदाणा बनतो. नंतर आम्ही शेततळे पहिले. त्या तळ्याचे पाणीही पिले. खूप मजा पण केली. मग आम्ही टमाटे आणले व झाडाखाली खायला बसलो तर तिथे आम्हाला एक खारूताई मेलेली दिसली. तिला आम्ही त्याच झाडाखाली गाडले कारण की ती कुजून  तेथील झाडांना खत म्हणून उपयोग व्हावा.
दिवसभर आम्ही खूप मजा केली आणि संध्याकाळी घरी परत आलो.
निमंत्रक: सतीश काकडे
अंबाजोगाई गट, बीड
आमच्या गटाची शनिवारी बैठक झाली. तेव्हा आम्ही ठरवलं की ग्रंथालय व बाराखांबी मंदिर पाहायला जायचंआहे. तिथे उत्खनन चालू होते. मग आम्ही योगेश्वरी मंदिराजवळ रविवारी ८.०० वाजता भेटायचे ठरवले. जमल्यानंतर त्या मंदिरापासून बाराखांबी मंदिराकडे जायला निघालो. वाटेत आम्ही खूप प्राणी व पक्षी पहिले. जसे की, मोर, घोडा, हरीण, काळवीट ई.
आम्ही सर्वप्रथम त्या मंदिराचे जवळ जाऊन निरीक्षण केले, त्यात आम्हाला काही मूर्त्या दिसल्या. सरांनी आम्हाला या मूर्त्यांची माहिती सांगितली. त्यापैकी काही मूर्त्यांचे नुकसान झाले होते. त्या मूर्त्या व मंदिर पाहिल्यावर असे लक्षात आले की ते मंदिर आणखी खाली खोदले तर तेथे आणखी मूर्त्या व अवशेष सापडतील. पण मूर्त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पुरातन विभागाने तेथील खोदकामाचे काम थांबवले आहे. आम्ही तिथेच बसून डब्बे खाल्ले व आम्ही तेथे मुंग्यांचे एक छानसे वारूळ पहिले. आम्ही तिथल्या मूर्त्या जवळून पहिल्या तेव्हा दिसलं की पुरातन विभागाने त्या मूर्त्यांवर नंबर टाकले होते कारण त्यांना कदाचित पुन्हा त्या मूर्त्या जोडायच्या असतील. दिवसभर आम्ही उत्खनन जागा पहिली, एकत्र डब्बे खाल्ले, खूप खेळलो आणि मजा करून घरी परत आलो.
गट निमंत्रक: दिनकर जोशी

अग्निपंख गट, नशिराबाद, जळगाव
आमच्या गटात एकूण १५ मुले आहोत. आमचे पालक जंगलात मजुरीसाठी जातात. कधीकधी आम्हीही शाळेला दांडी मारून त्यांच्यासोबत जातो. १० जानेवारीला आमच्या गटाची मिटिंग झाली, त्याच्यात मॅडमने आम्हाला अधिकार, हक्क याबाबत माहिती सांगितली. संविधानाने आपल्याला काय दिले? मग हक्क आणि अधिकार कोणाला कसे मिळाले? जसे बाहेर आहे तसेच घरात काय परिस्थिती आहे आहे? भावाला सर्व गोष्टी न मागताच मिळतात. आम्ही शेतात आणि घरीही कामं करतो पण ते सर्व घरखर्चासाठी वापरले जाते. सर्व मुलींच्या घरी हीच परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्ट बाबांना विचारावी लागते. आईपण रोज शेतात जाते, घरी सर्व कामं करते पण बाबा पैसे घेऊन जातात. घर कोणाच्या नावावर आहे? आजोबा नाहीतर बाबा. गल्लीत/ गावात सर्वांत जास्त कुणाला ओळखतात? आजोबा नाहीतर बाबा.. सर्व मान बाबांनाच मिळतो. घरात सल्ला घेण्यासाठी आईपेक्षा बाबांनाच जास्त विचारतात. म्हणून आईलापण आनंद मिळावा यासाठी, तिचाही आमच्या असण्यात वाटा आहे, आणि तिलाही सर्व हक्क असावेत म्हणून आईच्याच नावे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आईला पत्र पाठविले. पत्र आईच्याच नावाचे असल्यामुळे पोस्टमन काकाने जेव्हा आईच्या नावाने जोरात हाक मारली तेव्हा आजूबाजूला सर्वांना नवल आणि कुतूहल वाटले. काय असेल? कशाची नोटीस तर नाही. आईला जेव्हा वाचून तेव्हा खूप आनंद झाला. तिचा आनंद पाहून आम्हालाही खूप आनंद झाला.

गट निमंत्रक: निर्मला फालक