Showing posts with label उल्लेखनीय कृती. Show all posts
Showing posts with label उल्लेखनीय कृती. Show all posts

Wednesday, 1 August 2018

उल्लेखनीय कृतीकार्यक्रम


लहान मुलांचे शिबीर
आम्ही लहान मुलांचे शिबीर घ्यायचं ठरवलं. पण आमच्या परिसरात लहान मुलं नव्हती आणि आम्ही सगळे पण एका परिसारत राहत नाही मग शिबीर कुठे घ्यायचं याचा विचार केल्यानंतर महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांसाठी शिबीर घ्यायचं असं ठरलं. त्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना एक विनंती अर्ज लिहिला आणि तो घेऊन त्यांच्या कार्यालयात गेलो. पण तेव्हा नेमके ते अधिकारी कामानिमित्त बाहेर गेलेले होते. मग आम्ही काही वेळ वाट बघून परत आलो. जेव्हा ते अधिकारी परत आले तेव्हा त्यांनी आमचे पत्र वाचून आम्हाला परवानगी दिली व तसे फोन करून कळवले.


आम्ही शिबिराचे नियोजन करण्यासाठी बैठक घेतली. त्यात कोण-कोण काय-काय करणार याविषयी चर्चा केली. शिबिरासाठी कामात येतील अशा काय काय वस्तू घरी आहेत हे देखील बघायचं ठरलं. ठरल्यानुसार आम्ही महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७१३३ मध्ये गेलो. तेथील तिसरीच्या वर्गावर आम्ही शिबीर घेणार होतो. तिथे मुलं आणि मुलींचे वर्ग वेगळे होते. मग आम्ही आमच्यात देखील दोन गट केले. एक गट मुलांच्या वर्गावर गेला तर दुसरा मुलींच्या वर्गावर.
मुला-मुलीना बोअर नाही झालं पाहिजे याची आम्ही काळजी घेत होतो. त्यासाठी खेळ, क्राफ्ट, जोक्स असे आलटून पालटून सांगत होतो. आम्ही त्यांच्यासोबत विविध क्राफ्ट तयार केले. श्लोक ने सर्वांना जोक सांगून हसवलं. चित्र काढली. आम्ही मुलांना कागाची टोपी बनवायला शिकवली. तर बाकीच्या वर्गातील मुलंही ‘आम्हाला पण टोपी शिकवा’ म्हणत होती. मग आम्ही त्यांना पण टोपी बनवायला शिकवली. कागाचे फटाके देखील बनवले. चित्र काढतानी मुला-मुलींनी खूप मजा केली. त्यांनी रंगत हात बुडवले. नंतर आम्ही हत्तीला शेपूट लावायचा खेळ घेतला. तेव्हा देखील मुलांना खूप मज्जा आली. सुरुवातीला त्यांच्या टीचर पण वर्गात होत्या तेव्हा मुलं जास्त खुलत नव्हती. पण टीचर काही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर मुलं चांगली मिक्स झाली.
सगळे कार्यक्रम घेताना आम्हाला वेळ जरा कमीच पडला. अजून व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे होतं. आम्हाला वाटलेलं की एक-एक उपक्रमाला कमी वेळ लागेल पण प्रत्यक्षात जास्त वेळ लागला.
वेळ संपल्यावर सगळे मुलं-मुली विचारत होते, ‘तुम्ही परत कधी येणार?’ ‘तुम्ही रोज येणार का?’ मुलांना देखील खूप मजा आली आणि आम्हाला देखील खूप मजा आली.
मी माणूस संघ नाशिक
 मुलांनी केली शेती

बावधन येथील कुमार निर्माणच्या ‘ग्लोरिया किड्स’ या संघाने एक भन्नाट उपक्रम केला. शेती कशी करतात हे बघण्यासाठी त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या माळी दादाच्या मदतीने पालक लावला व त्याची काळजी घेतली. जेव्हा पालक भाजी मोठी झाली तेव्हा मुलांनी तो काढून आपापल्या घरी नेला व पालकचा उपयोग करून वेगवेगळे पदार्थ बनवले. हे सगळे पदार्थ घेऊन मुलांनी मस्त पैकी डब्बा पार्टी केली. तुम्हालाही ऐकायचंय का पालकचे नेमके कुठले कुठले पदार्थ या मुलांच्या डबा पार्टीला होते ते? तर पालक पनीर, पालक पकोडा, पालक कचोरी, पालक पिझ्झा, पालक इडली, पालक सॅंडविच, दाल पालक, आणि पालक भाजी. बापरे बापरे... एवढे पदार्थ! स्वतः उगवलेल्या पालकचे एवढे पदार्थ मुलांना नक्कीच खूप चविष्ट लागले असणार.


आता आम्ही आनंदाने खेळू शकू
आमची कुमार निर्माणची बैठक होती. मॅडम आल्यानंतर मुले जमा झाली. सर्वांत आधी आम्ही गाणी म्हटली. ‘लांबी दाढी वाले बाबा, गाडी आली गाडी आली आणि मग आम्ही सर्वांनी मिळून भरारीचं वाचन केलं. त्यावर विचार घेतले. नंतर काहीतरी करावं म्हणून विचार करू लागले. आमच्यातील एक जण म्हणाला, “आपण परिसरात वृक्षारोपण करूया.” मात्र मॅडम म्हणाल्या आपल्या परिसरात खूपच झाडे आहेत. त्यामुळे दुसरे काही विचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोन - तीन जण मल्लखांब खेळत असणाऱ्या मुलांकडे गेले. त्यातील काही मुलं पुश-अप्स काढण्यासाठी त्याकडे गेली पण त्याठिकाणी पाणी साचले होते व त्यावर मच्छर उडत होती. त्यावर काही करता येईल का? आम्ही मॅडमला विचारलं. आपण हे खड्डे बुजवावेत. त्यावर त्यांनी होकार दिला. मग आम्ही सर्वांनी वेगवेगळा विचार करण्यास सुरुवात केली. कुणी म्हणालं ‘आपण आधी दगड टाकू.’ मात्र ते शक्य नव्हते; कारण त्या ठिकाणी लहान मुले सुद्धा खेळतात. मग त्यावर चढताच आले नसते. मग कुणी म्हणालं ‘आपण खडी टाकू, मात्र ते सुद्धा चालणार नव्हतं. मग आम्ही मॅडमला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं; ‘ आपल्या परिसरात असे काय आहे, की रिकामे पडले आहे, आणि आपण त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. त्यावर होस्टेलची मुलांनी सांगितलं की आपण माती टाकू शकतो. मात्र माती टाकल्याने गाराच झाला असता. त्यावर एकाने सांगितले की हॉस्टेलच्या बाजूला रेती भरलेल्या पिशव्या पडल्या आहेत. आपण रेती टाकू शकतो. मग आमचं ठरलं. मात्र ती रेती आणायची कशी हा विचार सुरु झाला.


मग हॉस्टेलची मुले म्हणाली आपण लोटगाडी आणून त्यावर आणू शकतो. मग आम्ही लोटगाडी आणली. त्यावर काही मुलांनी रेतीच्या पिशव्या ठेवल्या. त्या आणल्या आणि ज्या ठिकाणी खड्डे होते पाणी साचले होते त्या ठिकाणी ते टाकले. दुसऱ्या मुलांनी ती रेती पसरवण्यास सुरुवात केली. अशा पद्धतीने आम्ही जाड-बारीक रेती टाकून त्या ठिकाणची जागा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यावर सर्वांनी आम्हाला शाबासकी देखील दिली. आम्हाला त्यामुळे अधिक विचार करण्याची प्रेरणा मिळाली.
आम्ही अशाच पद्धतीने अजून वेगवेगळे विचार करण्याचा प्रयत्न करावा असे सर्वांचे म्हणणे पडले आणि आम्ही ते सर्वांनी मनाने स्वीकारले सुद्धा! 
धमालमस्ती संघ
सावदा, जळगाव
 आम्ही पाणी मोजलं!
आता आम्ही आपण रोज किती पाणी वापरतो याचं मोजमाप करण्याचा उपक्रम करत आहोत. मागील वर्षी आम्ही आपल्याकडे पावसाचं किती पाणी पडतं हे मोजलं होतं. आपण कमीत कमी पाणी वापरलं पाहिजे म्हणून आम्ही हा उपक्रम करत आहोत. आम्ही आठवडाभर रोज आपण किती आणि वापरतो याचे मोजमाप करतो आहोत. आम्ही सगळ्या कामांसाठी लागणारं पाणी मोजतो. पिण्याचे पाणी मोजण्यासाठी आम्ही एक तांब्यात किती पाणी मावतं तसंच एक पेल्यात किती पाणी मावतं हे मोजलं आहे. त्यानुसार आपण दिवसात किती पाणी पितो हे मोजता येतं. तर आई-वडील शेतात जाताना पिण्याच्या पाण्याचा हंडा घेऊन जातात त्या हंड्यात किती पाणी मावतं ते पण आम्ही मोजलं आहे. बादली मध्ये किती पाणी आहे हे पाहण्यासाठी बादलीवर खुणा असतात. त्यामुळे आम्ही धुनी, भांडी, आंघोळ, फरशी पुसणे या कामांसाठी किती पाणी लागले हे देखील मोजता येतं.
अशाप्रकारे दिवसाला किती पाणी लागलं हे मोजून आम्ही पाण्याचा वापर कुठे कमी करता येईल हे बघणार आहोत.
प्रगती संघ
बेडूकवाडी, बीड

 ग्रहणाची चर्चा !
देगावच्या स्पंदन गटाच्या बैठकीत ग्रहणाचा विषय मुलांनीच काढला. त्यावर भरपूर चर्चा ‘झाली अंधश्रद्धेची वावटळ’ या पुस्तकातील ग्रहणाबद्दलचं लिखाण वाचूया असं देखील मुला-मुलींनीच सुचवलं. मग ते वाचून त्यावर पुन्हा चर्चा झाली. ‘ग्रहणाविषयी अंधश्रद्धा बाळगणार नाही व ग्रहण बघणारच’ अशी प्रतिज्ञा सर्वांनी केली. त्यासोबच घरच्यांनाही ग्रहण दाखवायचं असं देखील मुला-मुलींनी ठरवलं.
ग्रहण बघितल्या नंतरचे काही अनुभव पुढे देत आहोत.
मी शाळेतून येत होती तेव्हा शेजारच्या आज्या गप्पा मारत होत्या आणि बोलत होत्या की ‘आता चंद्रग्रहण लागणार आहे. आता कोणी बाहेर नका पडू. आपल्याला काहीतरी व्हायचं.’ असं बोलत होत्या. ते मी ऐकलं आणि मी त्यांना तिथे जाऊन सांगितलं, “आजी असं काही नसतं. चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. चंद्रग्रहण बघितल्यामुळे आपल्याला विविध तारे दिसतात. तुमच्या मनात काही आहे तसं काहीच नसतं. मी त्यांना सांगितले की तुम्ही चंद्रग्रहण पहा. त्यांनी चंद्रग्रहण लागायला सुरुवात झाल्यावर दरवाजा बंद करून घरात बसले.’

——————————————————————————————-
‘मी ग्रहण रात्री ११ वाजता पाहिलं पण त्याच्या अगोदर माझी आजी, मम्मी मला पाठवत नव्हत्या. माझी मम्मी म्हणाली ‘तुला काही समजतं का? ग्रहण पहायचं नसतं. आपल्या डोळ्यांना फार त्रास होतो. पण मी तिला बोलले की ग्रहणामुळे आपल्याला काहीच त्रास होत नाही. ग्रहण म्हणजे एकप्रकारे पृथ्वीचा उपग्रह चंद्र लाल होतो. नंतर तिला मी विचारलं आता मी जाऊ का ग्रहण बघायला? तरीही माझी मम्मी मला ग्रहण बघायला पाठवत नव्हती. मग मी आम्हाला बाईनी दिलेले ‘अंधश्रद्धेची वावटळ’ पुस्तक दिले व त्यातील ‘ग्रहण व करणी’ हा भाग वाचण्यास सांगितला. पण तिने त्यातला कोणताच भाग वाचून काढला नाही. दादा आणि मी मम्मी जेव्हा स्वयंपाक घरात काम करत होती तेव्हा बाबा झोपले होते तेव्हा आम्ही दोघांनी ग्रहण पाहिले. तेव्हा चंद्र लाल झालेला. पण दादा थोडं घाबरत होता. तेव्हा मी त्याला विचारलं तुला बाईंनी सांगितलं नाही. तेव्हा आम्ही ग्रहण पाहून झाल्यावर आम्ही घरी गेलो.’
 ——————————————————————————————-
‘मी घरी गेले व चहा पीत होती. माझ्या आईला मी बोलली की “आई मी आज ग्रहण पाहणार आहे.” तर माझी आई म्हणाली, “ग्रहण बघायचा नसतो. दुसऱ्या दिवसापासून माणसाला आजार होण्याची सुरुवात होते.” मी मझ्या दप्तरातील अंधश्रद्धेचं पुस्तक आणलं व तिला मी म्हणाली; “या पुस्तकामध्ये काही अंधश्रद्धेबद्दल लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवते.” मी ग्रहण हा भाग काढला व त्यावरचं वाचून दाखवलं. आणि काही भूत, साप, अंगात येणे असे काही पुस्तकातील भाग तीला वाचून दाखवले. तर मी तिला बोलली; “आता तरी मी ग्रहण पाहू शकते का?” तर ती बोलली “नको.” मी जेव्हा रात्री साडे सातला काकांकडे गेली. जेव्हा मी ११.३०ला माझ्या काकांबरोबर घरी येत होती तेव्हा मी आणि काकांनी दोघांनीपण ग्रहण पाहिलं. चंद्राचा पूर्ण भाग लाल रंगाचा झाला होता. पण मी अंधश्रद्धेच्या पुस्तकातील ग्रहण, भूत, अंगात येणे हे सगळं वाचून दाखवलं तरी तिने ग्रहण पाहिलंच नाही.’

निमंत्रकांच्या लेखणीतून


श्रीदेवीचा मृत्यू आणि मुलं
“सर तुम्हाला माहिती आहे का की एक हिरोईन (श्रीदेवी) मरण पावली?” या प्रश्नाने मुलांनी आजच्या बैठकीची सुरुवात केली. ती हार्ट अॅटॅकने दुबई इथे मेली असं टीव्हीवर दाखवत आहेत. “सर हार्ट अॅटॅक म्हणजे काय? तो का येतो?” अशा अनेक प्रश्नांचा भडीमार आज आमच्यावर मुलांनी केला.
यावर आम्ही चर्चा करत असताना शरीर यंत्रणा कशी चालते, कुठला अवयव कसे कार्य करतो यासंदर्भात विडीयो बघुन शरीराची कार्य करण्याची पद्धती, तसेच शरीरातील घटक, त्याचे प्रमाण किती इत्यादी समजून घेतलं. सोबतच हार्ट अॅटॅक कसा येतो, कुठल्या कारणांनी येतो, बी.पी. म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्यामागची कारणे तसेच मधुमेह इत्यादींच्या बाबतीत चर्चा झाली.
विशेष म्हणजे या चर्चेदरम्यान सोबतीला आणखी विषय होता. कालच त्याच्या शेजारच्या वस्तीतील एका मनुष्याचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. मुलांनी स्वतः त्यांच्या पालकांसोबत घटनास्थळी जाऊन हे दृश्य बघितले होते त्यामुळे काहींना रात्री भीतीमुळे झोप नाही आली व काहींना अनेक शंका होत्या. यातून त्यांना अनेक प्रश्न पडले. जसे की,
आता त्या माणसाचा आत्मा भटकत राहील का?
त्याच्या मालकाने लक्ष दिलं नाही तर तो त्यांना त्रास देईल का?
त्याचं भूत बनेल का?
त्याच्या आत्म्याला यम घ्यायला आला असेल का?
आत्मा असतो की नसतो?
माणूस का मारतो? मेल्यावर कुठे जातो? यम त्याला नेतो का?
वरती तर आभाळ आहे, माती नाही मग तो वर कसा राहणार, खाली पडून जाणार नाही का?
जाळून टाकले की माती होते मग आपलं शरीर मातीचं बनलेलं असतं का?
आत्मा कसा असतो? तो कोणते कपडे घालतो?
असे अनेक प्रश्न विचारून मुलांनी आम्हाला भंडावून सोडले. मग त्यावर आम्ही त्यांना काही प्रतिप्रश्न केले. जसे की, भूत असतं का?, तुम्ही त्याला बघितलं आहे का? कसं दिसतं?, कुठे राहतो? आम्हाला दाखवाल का?, आपण भुताला भेटायला जायचं का?, इ.

याबाबत चर्चा करत असताना ७ मुले भूत – आत्मा असतात याला सहमती दर्शवित होते तर ५ जण या विरोधात होते. यापैकी विरोधात असणारे अंधश्रद्धा असते म्हणून मोकळे झाले तर सहमती दर्शविणारे वेगवेगळे उदाहरण देऊन विशेष सांगण्याचा प्रयत्न करीत होते.
या प्रकारची चर्चा आजच्या बैठकीदरम्यान झाली. आमच्या परीने आम्ही मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.
निमंत्रक: नितीन कायरकर, सचिन भोगे,
बाल शिवाजी संघ, नागपूर
 सुषमा व सुलक्षणाची ज्ञानदीप संघाला भेट

 आज (१५ जुलै, २०१८) सुषमा व सुलक्षणा कोलगावहून आमच्या गटाला भेटायला आल्या होत्या. खूप पाऊस असूनही त्या दोघी ठरल्याप्रमाणे आल्या.
मुलांना आधीच सांगितले होते. दोन मुलांनी स्वतःहून दिदींसाठी पुष्पगुच्छ बनवून आणला.
त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. एक प्रार्थना शिकवली. मुलांकडून एक गोष्ट तयार करून घेतली. कोडी घेतली. गाणी, कानगोष्टी खेळ घेतला. मुलांना खाऊ आणला होता - खजूर. मुलांनी एक शाळेतील गाणं त्यांना म्हणून दाखवलं.
Get-together निरामयला - जिथे सुषमा व सुलक्षणा गट घेतात तिथे आहे. त्याविषयी मुलांनी त्यांना प्रश्न विचारले. कुठे आहे, काय आहे इ. त्या दिवशी काय करायचं यावर चर्चा झाली. जेवण काय हेही ठरलं.
मुलांनी खूप मज्जा आणि धमाल केली. कोणीतरी नवीन आपल्या गटाला भेट द्यायला, खास आपल्यासाठी आलंय या भावनेने मुलं खूपच खुश होतात. त्यांचा उत्साह पाहून ते जाणवत होतं.
निमंत्रक: अश्विनी जोशी
ज्ञानदीप संघ, झोळंबे, सिंधुदुर्ग

तीन ठिकाणी झाले गेटटुगेदर


देगाव येथील गेटटुगेदर
‘आम्ही नेहमीप्रमाणे प्रगती कुमार निर्माण संघाची बैठक सुरु केली. आम्ही सर्वांनी भरारी वाचले. त्यात गेटटुगेदरची माहिती व गेटटुगेदर करा असं लिहिले होते. मग या बैठकीमध्ये गेटटुगेदर करायचे ठरवले.
त्यानंतर एक दोन दिवसांनी सगळ्या मुलांनी घरातून गेटटुगेदरसाठी म्हणजेच देगावला जाण्यासाठी परवानगी मागितली व आई-वडिलांनी परवानगी दिली. नंतर देगावला जाण्यासाठी एसटीचा वेळ काढण्याची जबाबदारी कुणाल, प्रियांशु, तन्मय यांना सोपवली. सरांनी त्यांच्या मोबाईलवर आलेले निमंत्रण पत्राचे फोटो आम्हाला दाखवले व वाचायला सांगितले. त्यात जोक्स, कोडी, गाणी व ग्रामपंचायत जवळचे गवत काढावे अशी विनंती केली होती. त्या सोबतच भेळ करावी असेही लिहिले होते. आम्ही त्या सर्व विनंती स्वीकार केल्या. भेळीसाठी प्रत्येकाने आपापल्या घरातून एक-एक कांदा आणायचे ठरवले. भेळीसाठी लागणाऱ्या सामानाची दोन यादी केली. बाजारातून भेळीसाठी लागणारे सामान आणायची जबाबदारी मुलांनी घेतली. त्यानंतर कुणाल म्हणाला उन्हवऱ्याला जाणारी एकही एसटी नाही. प्रियांशु म्हणाला, देगावला एक बस जाते. मग सर म्हणाले, आपल्याला ट्रॅक्स, स्कूल बस किंवा मॅजीक सारख्या गाड्या मिळाल्या तरी चालेल. मग सर्व मुलांनी आपापल्या ओळखीच्या गाडीवाल्या दादांना विचारायचं ठरवलं. मग नंतर एकही गाडी मिळाली नाही. मग सरांनी सुद्धा विचारायचे प्रयत्न केले. त्यानंतर मुले बाजारात १२०० रु. घेऊन भेळीचे सामान आणायला गेले व सामान आणले. सामान आणायला सरांनी मुलांना त्यांच्याकडचे ५०० रु. दिले होते. त्यातल्या ५४५ रुपयांची खरेदी झाली. नंतर सरांना त्यांचे ५०० रु. परत केले. त्यानंतर एक टाटा मॅजीक गाडी भेटली. आमच्या सर्वांच्या मनात देगावला जाण्याचा विचार सतत फिरत होता. १५/७/२०१८ ला सकाळी मी तयारी करून साक्षीच्या घरी गेले. तिथून मी आणि साक्षी सरांच्या घरी जायला निघालो. तेव्हा साक्षीला चव्हाण काकींच्या दुकानातून चॉकलेट्स घ्यायचे होते. पण चव्हाण काकींचे दुकान बंद होते. मग आम्ही परत फिरलो आणि दुसऱ्या दुकानातून चॉकलेट्स घेतले. तेव्हा तिथे तन्मय आला. नंतर आम्ही तिघे सरांच्या घरी गेलो. हळूहळू सगळे सरांच्या घरी जमले. नंतर गाडी आली. आम्ही गाडीत बसलो व भेळीचे समान देखील गाडीत ठेवले. आम्ही जाताजाता गाण्यांच्या भेंड्या खेळत गेलो. आम्ही देगावला तेव्हा तिथे बाई व इतर मुले आली.
आम्ही एका वर्गातले सगळे बेंच दुसऱ्या वर्गात ठेवले आणि एक वर्ग रिकामा केला. त्या वर्गात आम्ही सगळे जण बसलो. स्पंदन गटाने ओळख करण्यासाठी ओळखीचा गेम सांगितला. आम्ही तो खेळ १० वेळा खेळलो. नंतर स्पंदन गटाने त्यांच्या गटाची स्थापना होण्यापासून ते आजपर्यंत घडलेले सर्व काही सांगितले व त्याच्यावर आम्ही प्रश्न विचारले. नंतर प्रगती गटाने त्यांच्या गटात स्थापना होण्यापासूनचे व आजपर्यंतचे घडलेले सर्व काही सांगितले. नंतर स्पंदन गटाने त्याच्यावर प्रश्न विचारले. नंतर आम्ही कोडी विचारली व जोक्स सांगितले. नंतर आम्ही आपापला डब्बा खाल्ला. डबा खाल्ल्यानंतर आम्ही खजिना शोध हा गेम खेळलो. तो खेळ खेळायला खूप मज्जा आली. त्यानंतर आम्ही भेळीसाठी लागणारे साहित्य कापले व बाईनी मोठ्या पातेल्यात चुरमुऱ्याचा एक पुडा ओतला. त्यात कांदा, मीठ, टॉमेटो, चिंचेचे पाणी टाकले व ते सगळे वाटप केले. सर्व मुलांना बाईंनी रांगेत बसायला सांगितले. एका मुलीने सर्व मुलांना पेपर डिश वाटल्या. एका मुलाने सर्वांना भेळ वाटली. त्या भेळीवर एका मुलाने शेव टाकली. नंतर सर्व मुलांनी भेळ खायला सुरुवात केली. तेव्हा गाडीवाले काका आले. सरांनी गाडीवाल्या काकांना सांगितले की थोडा वेळ लागेल. त्यांना भेळ खायला बोलावले पण ते आले नाही. कारण ते घरातूनच जेवण करून आले होते. आम्ही आनंदात भेळ खाल्ली. भेळ खूप छान झाली होती. आम्ही सगळ्यांनी डब्यात भेळ नेली व दापोलीला जायला गाडीत बसलो. घरी जाता-जाता सेव्हन-अप, मेमरी गेम, भेंड्या खेळलो. आणि मी घरी जे काही केलं ते सगळे सांगितले. मला देगावला जायला खरच खूप मज्जा आली.’

दीक्षा
प्रगती संघ, जालगाव, दापोली
 पुण्यातील गेटटुगेदर
पुण्यातील तीन संघ Warriors of truth, Adventure group आणि सृष्टी संघ यांचे गेटटुगेदर शिवाजी हौसिंग सोसायटीतील एका बागेमध्ये करायचे ठरले. दिनांक २९ जुलै संध्याकाळी ४ ते ६ सर्वांनी एकत्र यायचे ठरले. सृष्टी संघाचे प्रसन्न दादा आपल्या टीमला घेऊन वेळेत आले. माझेही दोन्ही गट वेळेत आले. कुणी चालत तर कुणी सायकलवर मजलदरमजल करत मुले बागेत पोचले. जेव्हापासून गेटटुगेदर करायचे ठरले त्या दिवसापासून सर्वजण खूपच उत्सुक होते. त्या दिवशी पण सारखे माझ्या घराची बेल वाजवून, फोन करून करून मला विचारत होती; ताई जमायचे ना एकत्र? झाले आम्ही सारे जण एकत्र आलो. ‘हीच अमुची प्रार्थना ...’ या छानश्या प्रार्थनेने सुरुवात केली. एकमेकांची ओळख करून घेतली. मग मी कुमार निर्माण म्हणजे काय? याची सविस्तर माहिती सांगितली. डॉ. अभय बंग व विवेक सावंत यांचे फोटो दाखविले व त्यांची यामागची कल्पना सांगितली.
नंतर आम्ही सर्वजण ‘वादळ सुटलं, वारा सुटला’ हा खेळ खेळलो. मुलांना खूप आनंद झाला. कुणीतरी हरलं म्हणून आपण जिंकलो हे मुलांना पटलं. नंतर Warriors of truth मधल्या भूमी, भव्या, साना या तिघींनी गाणं म्हटलं.
मग मी एक पप्रेरणादायी अशी लिझीची गोष्ट सांगितली. त्यांनतर सर्व संघातील काही मुलांनी जोक्स सांगितले. मुलांना खूपच हसायला येत होते. मग मी काही कोडी विचारले. तर मुलांनी उत्साहाने ताबडतोब उत्तरे दिली.
खेळ गाणी, गोष्टी झाल्यावर प्रत्येक संघाने समोर येऊन आतापर्यंत काय काय कृतिकार्यक्रम केले याविषयी सांगितले. प्लास्टिक वापरू नका, कागदी पिशव्या वापरा हा छान संदेशही दिला. घोषणा देखील दिल्या. ‘कुमार निर्माण कुणाचे, आमच्या छोट्या दोस्तांचे’ असे ओरडत ओरडत मुले बागेमध्ये फिरली. मग माही सर्वांनी मिळून छान खाऊ खाल्ला. काही मुलांनी खाऊ आणला नव्हता, पण सर्व मुलांनी आपापले डबे शेअर केले. मी व प्रसन्न दादाने सर्व मुलांसाठी खाऊ आणला होता, तोही शेअर केला. प्रसन्न दादानेही एक खेळ घेतला. खूप मज्जा आली. या दिवसाची आठवण म्हणून सर्व मुलांनी वृक्षारोपण केलं. आश्चर्य म्हणजे जेव्हा मुलं राष्ट्रगीत म्हणत होती तेव्हा संपूर्ण बागेतील जेवढे लोक होते ते सर्वजण उभे राहिले. हम होंगे कामयाब हे गाणं मुलांनी अगदी उत्साहाने म्हटले. कार्यक्रम संपला असे सांगितले तरीही कुणाचाही पाय निघत नव्हता. मुलं पुन्हा पुन्हा एकत्र येऊन एकमेकांशी अजून ओळख करून घेत होती. सृष्टी गटातील मुले प्रसन्न दादाला विचारत होती दादा आपण कधी होस्ट व्हायचे? या मुलांना आपण कधी आपल्याकडे बोलवायचे ? पुन्हा लवकरच सर्वजण भेटूयात असे एकमेकांना आश्वासन देऊन सर्वजण निघाले. एक चांगला विचार घेऊन आपापल्या घरी.
संजना शहा, पुणे
बोदवड येथील गेटटुगेदर
आमच्या गटाचा ‘गेट टुगेदर’हा कार्यक्रम झाला. उडान व संस्कृती गटाचा. आम्ही बोदवड येथे या कार्यक्रमासाठी गेलो. तेथे तर माझ्या खूप मैत्रिणी झाल्या. स्वाती, अश्विनी, पायल, लक्ष्मी, रितीका मयुरी, मयुरी ही त्यांची नावे. आणखीही खूप आहेत. पण नावं आठवत नाही हो! तेथे आम्हाला म्हणजे मला खूप मजा आली.
आधी आमचा असा खेळ झाला की ज्याने आमचा परिचय होईल. एक होता ‘परदेके पीछे क्या हे?’ आणि एकाचं नावं ठाऊक नाही मले. ठाऊक म्हणजे काय माहिती आहे का? ‘ठाऊक’ म्हणजे ‘माहिती’ बरं का ! आमची भाषा कळणार नाही तुम्हाला. पण आमची भाषा खूप चांगली आहे.
बोदवडला झालेले दोन्ही खेळ पण छानच होते. दोन्हीही मले खूप आवडले. त्यानंतर आमचा नाश्ता तयार झालं होता. मग नाश्ता झाल्यावर एक कृती गीत घेतले. त्याचे नाव ‘चाळणी मला गाळ ग नीट’ असंच काहीतरी होतं. पण मी सांगितलं तसं नाही बरं का! काय होते गड्या ?  हा! आठवलं आठवलं ‘चाळणीतलं पीठ म्हणे चाळ मला नीट’ हे होते. त्या कुरती गीताचे नाव. स्वारी स्वारी कृतीगीत म्हणतात त्याला ! स्वारी अं गलती झाली. माफ करा मला. केलंना मला माफ ?
जाऊ द्या मग आपण पुढे जाऊ. मग आम्हाला एक ‘जॉय’ नावाचा विडीयो दाखवला. खूप छान विडीयो होता. तो विडीयो पाहिल्यावर एक चित्रपट दाखवले. त्याचे नावं ‘द गुड डायनासोर’ हे होते. इतके छान चित्रपट होते की सांगूच काय? मला तर तीन वेळा रडू आलं तो चित्रपट बघताना. मग तो चित्रपट पाहून झाल्यावर आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यावर १० ते १५ मिनिट फिरलो. मग पुन्हा दोन-तीन कृतीगीतं घेतली. परत गुरुपोर्णिमेचाही कार्यक्रम झाला. अध्यक्ष बाऱ्हे सर व प्रमुख पाहुणे ढेंगे सर म्हणजे आमचे दादा होते. मग उडान गटाने कविता कृतीसह करून दाखवली आणि एक नाटिका केली. ती नाटिका ‘भारुड’ स्वरूपातली होती. तिचे नाव ‘मला दादला नको गं बाई’ दादला म्हणजे नवरा. हे सर्व झालं की आम्ही चहा पिलो.
योगेश जवंजाळ सरांना व संस्कृती गटाला ग्रीटिंग दिलं आणि आम्ही वृक्षारोपण केलं. दोन शिसमचे झाडं लावली. त्यांना सांगितलं की ही झाडे आमची आठवण म्हणून जगवा. मग आम्ही त्यांना बाय-बाय म्हणून गाणे म्हणत घरी परतलो.
दिक्षा जगदेव इंगळे.
‘उडान संघ’, भोटा, जळगाव.
  


Tuesday, 26 June 2018

उल्लेखनीय कृतिकार्यक्रम


आम्ही भरवले उन्हाळी शिबीर!

आमच्या ताईंकडे प्रणाली दीदी आणि शैलेश दादाने उन्हाळी सुट्टीचे उपक्रम पाठवले होते.  त्या उपक्रमांतून उन्हाळी शिबिराचा उपक्रम करायचा असं आम्ही ठरवलं. त्यासाठी आम्ही बैठक संघाची बैठक बोलवली. शिबिरात काय-काय करायचं याविषयी खुप चर्चा केली. त्यात असं ठरलं की निरामय केंद्राच्या सभागृहात लहान मुलांसाठी ३ दिवसांचं शिबीर आयोजित करायचं.  शिबिरासाठी कोलगाव व सावंतवाडीमधील काही शाळांमधील लहान मुलांना बोलवायचं असं ठरलं.  त्यासाठी आम्ही काही शाळा ठरवल्या आणि त्या शाळांमध्ये जाऊन तिथल्या मुख्याध्यापकांना भेटलो. त्यांना आमची शिबिराची कल्पना सांगितली आणि तुमच्या शाळेतील काही विद्यार्थी पाठवा अशी त्यांना विनंती केली. निघताना पुन्हा एकदा ‘तुम्ही किती मुले पाठवाल?’ अशी विचारणाही केली. त्यानुसार अंदाजे विद्यार्थ्यांची एक यादी बनवली. सोबतच शिबिरात काय काय करायचं याचंही प्लांनिंग सुरू होतंच. त्यात आम्ही मुलांना गोष्टी सांगणे, गाणे शिकवणे, त्यांचे खेळ घेणे, नाटक बसवणे, ओरिगामी शिकवणे असं बरंच ठरवलं.
 अखेर तो दिवस उजाडला. संघातील आम्ही सर्वजण निरामय केंद्रात जमलो परंतु मुलांची संख्या खूपच कमी दिसत होती. तरी आम्ही आमचं शिबीर सुरूच ठेवलं. त्यात आम्ही वाचन केलं, गोष्टींची पुस्तके वाचली. वाचलेल्या गोष्टी अधिक समजाव्यात म्हणून आम्ही विद्यार्थ्यांचे दोन गट केले आणि वाचलेल्या गोष्टींचे नाटकांत रुपांतर केले. आणि मग दोन्ही गटांनी आपापले नाटक सादर केले. त्यानंतर आम्ही खुप खेळ खेळलो, गाणी म्हटली, ओरिगामीच्या विविध वस्तू बनवल्या आणि भरपूर धम्माल केली.
असं आम्ही सलग तीन दिवस दररोज ३ तास हे शिबीर घेतलं. शिबिरात सर्वांना खुपच मज्जा आली. तीन दिवस कसे गेले हे सर्वांना कळलंच नाही आणि मग तिसऱ्या दिवशी आम्ही शिबिराची सांगता केली.
प्रणय ठिकार, निर्मिती संघ, कोलगाव
निमंत्रक: सुलक्षणा व सुषमा

“उन्हाळ्याच्या सुट्टीची कमाल...मुलं करतील धम्माल!!!”


१६ मे रोजी आमच्या संघाची मिटिंग भरली. मिटिंगमध्ये दादांनी आम्हाला उन्हाळाच्या सुट्टीत करायच्या कृतिकार्यक्रमाची पत्रिका दिली. ती संपूर्ण वाचल्यानंतर सर्व मुला-मुलींच्या सहमतीने आम्ही ‘लहान मुलांसाठी उन्हाळी शिबीर’ हा कृतिकार्यक्रम करायचं ठरवलं.
आता हे शिबीर कसं, कुठे आणि कधी करायचं यावर चर्चा सुरु झाली. मग आम्ही चर्चेतून शिबिराची रूपरेषा ठरवली. शिबिराचं नाव आम्ही ‘प्रगती समर कॅम्प’ असं ठेवलं आणि “उन्हाळ्याच्या सुट्टीची कमाल...मुलं करतील धम्माल!!!” हे शिबिराचं घोषवाक्य ठरवलं. १८ मे ही तारीख तर जि. प. शाळा हे शिबिराचं ठिकाण ठरलं आणि वेळ ठरली सकाळी ७ ते १०!
रूपरेषेसोबत शिबिराचे काही नियमही आम्ही ठरवले. जसे की,
· शिबीर ५ ते १० वयोगटातील मुलांसाठी असेल.
· शिबीरात बेडकुचीवाडी, पिंपळनेर व सांडरणवन येथील मुलं सहभागी होऊ शकतात.
· मुलांसाठी छान छान गाणी घेतली जातील.
· मुलांसाठी लिंबू-चमचा, पोत्यात पाय घालण्याची शर्यत, व बेडुक-उडी शर्यत या स्पर्धा.
· प्रत्येक स्पर्धेत दोनच विजेते राहतील. प्रथम पारितोषीक - वही, द्वितीय पारितोषीक - पेन.
· मुलांचे खेळ घेऊन मज्जा करणे.
आमच्या शिबिराची माहिती परिसरातील मुलांना कळावी यासाठी आम्ही पोस्टर्स बनवायचं ठरवलं. पण आमच्याकडे मोठे कागद नव्हते ते बाहेरून आणावे लागणार होते. चर्चा सुरु असताना मध्येच रुपाली म्हणाली की, त्या मुलांना खाण्यासाठी काहीतरी पाहिजे. मग वैष्णवी म्हटली, “मी पोहे करते”, रुपाली म्हटली, “मी भेळ करते.” तेव्हा दादा म्हटले भेळ व पोहे करायचे असतील तर सामान भरावं लागेल. सागर म्हटला, “सर्वांनी १०-१० रु. जमा करायचे.” याला सर्वांनी ‘हो’ म्हटले पण त्यादिवशी संघातील सर्वजण उपस्थित नव्हते, आम्ही फक्त ८ जण उपस्थित होतो. बाकी जण मामाच्या गावाला गेले होते. मग जेवढे आहेत तेवढ्यांनी १० रु. जमा करायचे असं ठरलं. मग दुसऱ्या दिवशी दादांनी आम्हाला मोठे कागद आणून दिले आणि मी व वैष्णवीने मिळून चार्ट तयार केले. चार्टवर कुमार निर्माण, त्याखाली आमच्या संघाचं नाव लिहिलं. त्याच्याखाली वयोगट, ठिकाण आणि आयोजित केलेल्या स्पर्धांचे नावं लिहिले. मग पोस्टर्स लावले, त्यांतील एक लिंबारुई (देवी)  मध्ये दुकानाबाहेर लावले, सांडरवन गावातील मंदिरात एक लावले, एक पिंपळनेर मध्ये तर एक आमच्या गावातील मंदिरात लावले. त्यादिवशी दादा व ओंकारने नाश्त्याचे सर्व सामान भरून आणले. आमचे फक्त ८० रु. झालते, दादांनी वरून २६० रु. टाकले. त्यादिवशी दुपारी ४ वाजता आम्ही संघातील सर्व जणांनी ज्याच्या घरी ५ ते १० वर्षांतील मुल आहे त्यांच्या घरी जाऊन ‘उद्या त्याला/ तिला सकाळी ७ वाजता शाळेत पाठवा’ असं सांगितलं.
शिबिराच्या दिवशी म्हणजे १८ मे ला संघातील सर्व जण सक्काळी ६.३० वाजता शाळेत जमले. मग आम्ही शाळेतील बाहेरच्या बोर्डवर कुमार निर्माण व आमच्या संघाचं नाव लिहून त्यासोबत सुस्वागतम असं लिहिलं. सर्व मुलं-मुली जमा झाल्यावर संघातील रुपाली, वैष्णवी व भाग्यश्रीने ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना म्हटली आणि बाकीच्यांनी त्यांच्या मागून म्हटली. मग तुषारने एक छानशी गोष्ट सांगितली आणि सागर व तुषारने सर्वांचं ‘लंबी दाढीवाले बाबा’ हे गाणं घेतलं. त्यानंतर रुपालीने येगं येगं सरी, ये रे ये रे पावसा व नाच रे मोरा ही बालगीतं म्हटली. नंतर सर्वांना गोलात उभं करून दादांनी ‘हरियाली इधर उधर’ हे गाणं घेतलं  आणि नंतर वैष्णवी आणि भाग्यश्रीने ‘इतना बडा पहाड’ हे गाणं घेतलं. नंतर  वैष्णवी, रुपाली, ओंकार, अभिषेक असे सर्व मिळून नाश्त्याच्या तयारीला लागले. ठरल्याप्रमाणे रुपालीने भेळ व वैष्णवीने पोहे बनवले. पोहे बनवण्यासाठी एका काकूंनी आम्हाला थोडी मदत केली.नाश्ता तयार होईपर्यंत तुषार व सागर यांनी मुलांना सांभाळले. नाश्ता तयार झाल्यावर सर्वांना एकत्र बसवून नाश्ता वाढला.  मुला-मुलींचा नाश्ता झाल्यानंतर संघातील आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. नंतर आम्ही ‘लिंबू चमचा’ ही स्पर्धा घेतली, त्यात तन्मयचा पहिला नंबर आला. मग आम्ही सर्वांना चॉकलेट वाटल्या. आमच्या शिबिरात एकूण ४६ मुलं-मुली सहभागी झाले होते. हे सर्व करताना आम्हाला खुप आनंद वाटला, मज्जा आली व आम्ही खुप धम्मालही केली!


रुपाली व वैष्णवी, प्रगती संघ, बेडकुचीवाडी
निमंत्रक: सदानंद चिंचकर
आमचे बर्ड फीडर्स!
२२ एप्रिलला आमच्या स्नेहसंस्कार संघाची बैठक होती. ‘पायाखाली भूमी माता’ या गाण्याने आम्ही बैठकीची सुरुवात केली. मग आम्ही आधीच्या बैठकीविषयी चर्चा केली. अशीच चर्चा सुरु असताना ताईने प्रश्न टाकला की ‘पक्षी घरटे कसे तयार करतात? ते खाद्य कसे मिळवतात?’ मग आमची या प्रश्नांवर चर्चा सुरु झाली. प्रत्येकजण स्वतःला माहित असलेली माहिती सांगू लागले. चर्चेमधून एक प्रश्न उपस्थित झाला की ‘आता उन्हाळ्यात आपण पक्ष्यांना कशाप्रकारे मदत करू शकतो?’ मग यावर आम्ही चर्चा करत असताना पक्ष्यांसाठी ‘बर्ड फिडर’ बनवायचे असं ठरलं. मग ते कसे बनवायचे याविषयी बोलत असताना ताईने आम्हाला एक विडीयो दाखवला. त्यात बघुन आणि काही स्वतःच्या आयडिया लावून पुढच्या रविवारी बर्ड फिडर बनवून जवळच्या फायर ब्रिगेड ऑफिसच्या अंगणात बसवायचे असं ठरलं. मग पुढच्या रविवारी २९ मे ला बैठकीला येताना आम्ही बर्ड फिडर बनवून आणले आणि ठरल्याप्रमाणे फायर ब्रिगेड ऑफिस मध्ये गेलो व तिथल्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली आणि त्यांनी परवानगी दिली. त्यांनी आम्हाला सर्वांत जास्त पक्षी कुठे येतात ते दाखवलं आणि तिथे बर्ड फिडर लावण्यात मदतही केली. तेथील अधिकाऱ्यांना हे पाहून फार आनंद झाला. मग परत आल्यावर बर्ड फिडर तयार करताना आलेले अनुभव व अडचणी यांचे सर्वांनी शेअरिंग केले. परत असा उपक्रम करायला हवा असं सगळ्यांचं मत पडलं आणि ते पुढच्या बैठकीला ठरवायचं असंही ठरलं. मग ६ मे ला आम्ही लावलेले बर्ड फिडर पाहायला गेलो आणि तेथील काकांना विचारले की ते ‘पाणी टाकतात का? पक्षी येतात का?’, तेव्हा त्या काकांनी आम्हाला सांगितले की ते स्वतः त्यात पाणी ओततात आणि पक्षीही रोज येतात. पण त्यांनी एक सांगितलं की धान्याच्या बर्ड फिडरमध्ये काठी लावल्याने पक्ष्यांना धान्य खाता येत नाही तेव्हा लक्षात आलं की काठीच्या जागी चमचा लावायला हवा होता. पण पक्षी येतात हे ऐकुन आम्हाला फार आनंद झाला आणि त्या काकांचा निरोप घेऊन आम्ही परत आलो.
स्नेहसंस्कारसंघ पुणे
निमंत्रक: विजया धनगर आणि टीम

 माझा वाढदिवस!

१४ नोवेंबरला आमच्या शाळेत बालदिनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी बरेच मुलं त्यांचे मत मांडत होते आणि प्रत्येकजण काहीतरी संकल्प करीत होता. कोणी नियमित अभ्यास करण्याचा, कोणी नेहमी खरे बोलण्याचा, कोणी मोठ्यांचा आदर करण्याचा पण मला काही सुचत नव्हतं. माझी आई माझ्या शाळेत टीचर आहे मी तिला म्हटलं की मला काही सुचत नाहीये पण मला काहीतरी वेगळा संकल्प करायचा आहे. आईने मला एक आयडिया सुचवली की ‘वाढदिवसाला आपण फुगे, केक यावर भरपूर पैसे खर्च करतो, त्यापेक्षा काही वेगळं तुला करता येईल.’ मग मी ठरवलं की त्या पैशांतून माझ्या शाळेतील एका गरजू मित्राला छान नवे कपडे घेईल.
 पण माझा वाढदिवस अजून भरपूर लांब म्हणजे २९ एप्रिलला होता. मग पाच महिन्यांनी एप्रिल उजाडला. परीक्षेनंतर १३ एप्रिलला आम्हाला शाळेला सुट्ट्या लागणार होत्या. मी विचार केला की मी ठरवलेलं गिफ्ट कधी आणि नेमकं कुणाला देऊ. मग मी मनोज बारेला या माझ्या मित्राला ते गिफ्ट द्यायचं ठरवलं कारण तो खूपच गरीब आहे पण अभ्यासात खुप हुशार आहे आणि खो-खो, कबड्डी या खेळांत त्याला बक्षीसही मिळाले आहे. मग मी मनोजसाठी एक नवा ड्रेस घेतला. १२ एप्रिलला सकाळी शाळेत गेल्यावर प्रार्थनेच्यावेळी माझ्या सगळ्या शिक्षकांसमोर आणि मित्रांसमोर मनोजला समोर बोलवलं आणि माझा संकल्प सांगितला. मी आणलेला नवीन ड्रेस त्याला गिफ्ट दिला आणि त्याला तो लगेच घालून यायला सांगितलं. तो परत आल्यावर त्याला तो ड्रेस खुप आवडला त्यामुळे मला आणि माझ्या मित्रांना खुप आनंद झाला.

धीरज पाटील, नेचर संघ, एरंडोल
निमंत्रक: शरद पाटील
 कागदी पिशव्यांचे वाटप!

आमच्या गटाची २१ मार्च २१०८ या दिवशी या मीटिंग घेण्यात आली. त्या दिवशी चर्चा चालू असताना विवेक याने त्याचं मत मांडलं की आत्ता नुकताच गुढीपाडवा होता व त्यादिवशी चोपडा या शहरात प्लास्टिक-बंदी करण्यात आली व या प्लास्टिक-बंदीला चालना मिळावी म्हणून आपण काहीतरी करावे असं विवेकचं मत होतं. मग सर्व टीममधील मुलांनी मिळून ठरवलं की आपल्या घरी येणाऱ्या वर्तमान पत्रापासून आपण लहान कागदी पिशव्या बनवू. चर्चेमध्ये असं ठरलं की आपण जर पिशव्या किराणा दुकानावर दिल्या तर त्या किराण्याच्या वजनाने फाटतील आणि मग त्या पिशव्यांचा किराणा दुकानात काही उपयोग होणार नाही. म्हणून मग आम्ही कागदी पिशव्या मेडिकल स्टोअर्सवर द्यायच्या असं ठरवलं. मग सरांनी आम्हाला सुचवलं की त्यासाठी आम्हाला आमच्या भागातील मेडिकल स्टोअर्सची यादी बनवावी लागेल.
मग २४ मार्चला या विषयावर परत मिटिंग घेण्यात आली व त्या दिवशी आम्ही मुला-मुलींनी आपापल्या भागातील मेडिकल स्टोअर्सची यादी बनवली आणि नंतर एका दुकानात एका दिवसाला किती गिऱ्हाईक येतात याचीही माहिती मिळवली. मग आम्ही काम सोपं व लवकर व्हावं म्हणून तीन-तीन मुला-मुलींचे गट केले आणि पिशव्या बनवायला घेतल्या. आम्ही एक लहान व एक मोठी अशा दोन प्रकारच्या पिशव्या बनवल्या अन २७ मार्चला सर्वांच्या पिशव्या एकत्र केल्या. मग २८ मार्चला त्या सर्व पिशव्यांचे ५० – ५० पिशव्यांचे गठ्ठे केले आणि मोजले तर आमच्या ३००० पिशव्या बनल्या होत्या.
मग २९ आणि ३० तारखेला आम्ही परत तीन-तीनच्या गटाने या पिशव्यांचे मेडिकल स्टोअर्समध्ये वाटप केले. एकूण ५८ मेडिकल स्टोअर्समध्ये टीममधील सर्व मुला-मुलींनी बनवलेल्या कागदी पिशव्या वाटल्या.
हे करताना आम्हाला खुप मजा आली आणि आनंदही झाला.
प्रणव, फ्रेंड्स फॉरएवर टीम, चोपड़ा
निमंत्रक: जितेंद्र देवरे