Saturday, 31 December 2016

गोष्ट


खूप वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर मानवाचा जन्म झालेला नव्हता तेव्हाची ही गोष्ट आहे. सगळ्या पृथ्वीवर जंगल पसरलेलं होतं. नदी नाले स्वच्छ पाण्याने भरून वाहत. काही ठिकाणी वाळवंट पसरलेलं होतं, तर काही ठिकाणी बर्फाच्छादित उंच शिखरं होती. जंगलांमध्ये प्राणी आणि पक्षी एकमेकांना मदत करत मजेत राहत होते.
पण एक दिवस कुठल्याशा कारणावरून प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये भांडण सुरु झालं. बघता बघता भांडणाने उग्र रूप धारण केलं. वाद-विवादापासून सुरु झालेलं भांडण लवकरच मारामारी पर्यंत पोहचलं. दोन्ही बाजूंनी युद्धाची तयारी जोरात सुरु झाली. सगळे आपापल्या शस्र-अस्त्रांची जमवाजमव करू लागले. प्राण्यांनी वाघाला आपला राजा निवडलं तर पक्ष्यांचा राजा म्हणून गरुडाची निवड करण्यात आली.
युद्धाचा सराव जोरात सुरु झाला. प्राण्यांकडून हत्तीला चांगला खाऊ पिऊ घातलं जाऊ लागलं. घोड्यांच्या पायांना नाल ठोकून घेतले गेले. माकडांना झाडावर चढून पक्ष्यांची घरटी पडण्याचं काम देण्यात आलं. पक्षांनी आपापल्या चोचींना धार करून घेतल्या, नखं तीक्ष्ण करून घेतली. अशाप्रकारे सगळीकडे धामधुमीचा माहोल निर्माण झाला.

या सगळ्यात वटवाघूळ मात्र कुठेही नव्हते. वटवाघूळाने कुणाचीही बाजू घेता तटस्थ राहायचं ठरवलं होतं हे कळताच प्राणी आणि पक्षांकडून वटवाघूळाला आपल्या बाजूनी घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. प्राणांच्या वतीने वाघ वटवाघूळाला भेटायला गेला. वाघाने वटवाघूळाला समजावले की तू अंडी देता पिल्लांना जन्म देतोस म्हणजे तू प्राणी आहेस म्हणून तू आमच्याकडून लढायला ये. पण वटवाघूळाने त्याला नकार दिला. मग पक्षांच्या वतीने गरुड वटवाघूळाच्या भेटीसाठी गेला. त्याने गरुडाला समजावलं की तू पक्षी आहेस. तुला पक्षांप्रमाणे उडता येतं म्हणून तू आमच्या बाजूने लढायला ये. पण वटवाघूळाने त्याला पण नकार दिला.
शेवटी प्राणांमध्ये आणि पक्षांमध्ये मोठं युद्ध झालं. दोन्ही बाजूंनी खूप सैनिक धारातीर्थी पडले. खूप दिवस युद्ध चालल्यानंतरही उद्धाचा निकाल काही लागेना. कोण जिंकेल किंवा कोण हरेल याविषयी पुसटसा अंदाज देखील येत नव्हता. शेवटी खूप दिवस युद्ध चालल्याने सगळे  अगदी दमून गेले. दोन्ही बाजूंचा अन्नसाठा देखील संपत आला. शेवटी प्राणी वाघाकडे गेले आणि म्हणाले कीमहाराज अजून किती दिवस असं युद्ध चालणार कोणीही जिंकत नाहीये आपला अन्नसाठा देखील आता संपत आलाय, सगळ्यांचेच हालहाल होतायत’. तसेच सगळे पक्षी देखील मिळून गरुडाकडे गेले आणि हे युद्ध थांबवूया असं म्हणाले.
शेवटी वाघ आणि गरुडाने एकत्र बसून चर्चा केली आणि ठरवलं की या युद्धातून काहीही निष्पन्न होतं नाहीये तरी आपण हे युद्ध थांबवूया आणि पुन्हा एकदा शांततेने एकमेकांसोबत राहूया.
अशा प्रकारे प्राणी आणि पक्षी यांच्यातील भांडण संपलं आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले. जंगलांत पुन्हा एकदा शांतता नांदू लागली. प्राणी आणि पक्षांमधील सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले.
पण या युद्धामध्ये वटवाघूळाने कोणाचीच बाजू घेतल्याने त्याला प्रण्यांनीही नाकारलं आणि पक्ष्यांनीही नाकारलं. वटवाघूळाला कोणीच आपल्यात घेईना आणि शेवटी धड प्राणी पक्षी अशी त्याची गत झाली आणि ते झाडावर लटकत बसलं.

कुमार गीत

प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा

 प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का?
शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका

कुत्र्याची शेपूट वाकडी का?
पेग्वीनची मान तोकडी का?
क्रिकेटची बॅट लाकडी का?
सापाची चाल वेडीवाकडी का?
प्रश्न विचारा...

वटवाघूळ रात्री फिरतात का?
मासे पाण्यात तरतात का?
पतंग दिव्यावर मरतात का?
काजवे चमचम करतात का?
प्रश्न विचारा...
खोकल्याची उबळ येते का?
सर्दीत नाक गळते का?
मेंदूला वास कळतो का?
आठवणीने उचकी लागते का?
प्रश्न विचारा...

रंगीत तारे असतात का?
दिवसा तारे दिसतात का?
जीवसृष्टी कुठे असेल का?
माणसासारखा माणूस दिसेल का?
प्रश्न्न विचारा...

प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का?
शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका


चित्र चर्चा


खालील चित्र पाहून काय वाटते? चर्चा करा. यांवर एखादी गोष्ट रचता येईल का?


आवाहन


Tuesday, 31 May 2016

संपादकीय

नमस्कार दोस्तांनो,

काय मग? सुट्ट्यांची धम्माल चालू असेल तुमची आत्ता! मज्जा-मस्ती, दिवसभर खेळणं, मामाच्या गावाला जाणं, कुटुंबासोबत मस्तपैकी फिरायला जाणं, स्वतःचे छंद जोपासणं आणि बरंच काही... आणि आत्ता एक भारी गोष्ट म्हणजे लवकरच तुमची शाळा आणि पाऊस सोबतच सुरु होतील. तुम्ही सर्वजण वरच्या वर्गात जाल. मग नवीन मित्र, नवीन वह्या-पुस्तकांचा तो छान सुवास नी त्यासोबतच पाऊस पडल्यावर येणारा मातीचा मंद सुवास! अहाहा!

मित्रांनो, लवकरच तुम्ही आता कुमार निर्माणच्याही पुढील वर्षात जाल. वर्षभर केलेल्या कौतुकास्पद कृतिकार्यक्रमांनंतर तुम्हाला नक्कीच छान वाटत असेल. म्हणून गटातील अनुभवी व मोठी मुलं म्हणून आम्ही तुमच्यावर एक जबाबदारी देतोय. ती म्हणजे तुम्ही केलेल्या कृतिकार्यक्रमांबद्दल, त्यांतल्या मजेबद्दल आणि अर्थातच कुमार निर्माणबद्दल आपल्या इतर मित्रांना, भावंडाना नक्की सांगा आणि निमंत्रकाच्या मदतीने त्यांनाही तुमच्या गटात सामील करून घ्या.

या अंकात ‘उन्हाळी कुमार निर्माण’ या २ गटांसाठी पहिल्यांदाच केलेल्या भन्नाट प्रयोगाचा वृत्तांत तसेच ‘सक्षम’ गटाचा भेट वृत्तांत देत आहोत. सोबत तुमच्याच वयाच्या धाडसी ‘मलाला’ची गोष्ट आणि ‘१० वी फ’ या तुमच्याच वयाच्या मुलांच्या सिनेमातील एक गाणं देखील देत आहोत.

आम्हाला खात्री आहे की सुट्ट्यांमधल्या मजेसोबत तुम्ही कुमार निर्माणचे विद्यार्थी म्हणून आपापल्या वैयक्तिक पातळीवर किंवा आपल्या नवीन मित्रांसोबत तसेच भावंडांसोबत नक्कीच काही कृतिकार्यक्रम केले असतील. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र आल्यावर लगेच गटाची एक बैठक घ्या व सुट्ट्यांमध्ये केलेले उपक्रम त्याबरोबरच तुम्हाला आलेले अनुभव गटात शेअर करा आणि नेहमीप्रमाणे आम्हालाही फोनवर कळवा किंवा लिहून पाठवा.

आता लवकरच म्हणजे जुलै महिन्यात आपण सर्वजण तुम्ही वर्षभर केलेल्या कृतिकार्यक्रमांचे व तुमचे कौतुक करण्यासाठी पुन्हा भेटतोय! या भेटीत आपल्या विभागातील इतर गटांतील मित्रमैत्रीणीना भेटूया, तुम्ही सर्वांनी संपूर्ण वर्षभरात केलेले कृतिकार्यक्रम समजून घेऊया आणि सोबतच ‘उन्हाळी कुमार निर्माण’ च्या दोन्ही गटांनी केलेले कृतिकार्यक्रमही समजून घेऊया.
या कार्यशाळेत तुम्ही थोडी तयारी नक्कीच करून येऊ शकता. ती म्हणजे, तुमच्या गटाला किंवा गटातील एखाद्या मित्रमैत्रिणीला जर एखादे छोटे नाटक, नाट्यछटा, गाणे किंवा नाच यातलं काहीही येत असल्यास त्याची छान तयारी करून या आणि कार्यशाळेत सादर करा.

याशिवाय आता लवकरच बहुतेकांचा आवडता ऋतू अर्थातच पावसाळा सुरु होतोय. पावसाळ्याचा खूप आनंद लुटा, मस्तपैकी गटासोबत व इतर मित्रांसोबत हुंदडायला जा, अंगणात कागदाच्या होड्या सोडा, पावसाळ्यात तुम्हाला तुमच्या आजूबाजूला नवनवीन पक्षी दिसतील, त्यांचेही निरीक्षण करा. खूप खूप मजा करा!  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही या पावसाळ्यात जर कुठे फिरायला गेलात तर गटाचे अनुभव नक्कीच आम्हाला कळवा.

लवकरच भेटूया आणि दिवसभर खूप खूप धम्माल करूया!
-टीम कुमार निर्माण


उन्हाळी कुमार निर्माण

यावर्षी कुमार निर्माण अंतर्गत ‘उन्हाळी कुमार निर्माण’चा एक भन्नाट प्रयोग करण्यात आला. तुम्हा मुलांसोबतच इतरही मुलांना त्याचा आनंद घेता यावा हे त्याचं मुख्य उद्धिष्ट आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या झाल्या साधारण सगळीकडे निरनिराळ्या प्रकारच्या शिबिरांची सुरुवात झालेली असते. सुट्ट्यांत आपल्या मनासाखं काहीतरी आपल्याला करायचं असतं. पण या कॅम्प मुळे तसं काही आपल्याला करता येत नाही म्हणून सुट्ट्यांमध्ये आपल्या परिसरात आपल्याला काही भन्नाट करता येईल का हे बघण्यासाठी.. नव्हे असं कही तरी भन्नाट करण्यासाठी यावर्षी उन्हाळी कुमार निर्माणचा प्रयोग करण्यात आला. या उद्देशाने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी ‘उन्हाळी कुमार निर्माण’चे एकदिवसीय शिबीर आयोजित केले. त्यात आधीच ठरवल्याप्रमाणे मैत्री, उन्हाळा आणि आजी-आजोबा या ३ विषयांवर भर देण्यात आली.  खेळाच्या व चर्चेच्या माध्यमातून दोन्ही गटातल्या मुलांनी अनेक प्रकारचे कृतिकार्यक्रम सुचवले आणि ते सुट्टीत करण्याचे ठरवले. या दोन्ही शिबिरांचा वृत्तांत देत आहोत.

नेचर गट- एरंडोल
१८ एप्रिलला आम्ही (प्रणाली व शैलेश) आणि वर्धिष्णू गटाचा निमंत्रक अद्वैत असे तिघे सकाळी ११च्या सुमारास एरंडोल येथे पोचलो. शिबीर एरंडोल येथील ‘सम्यक स्कूल’ मध्ये होते. आम्ही तिथे पोचलो तेव्हा मुले आमची वाटच पाहत होती. शिबिरासाठी नेचर गटाची ११ मुले जमली होती. मुलांशी आधीच्या भेटीमुळे ओळख झालेली असल्याने ती अगदी मोकळेपणाने बोलत होती. गेल्यानंतर सुरवातीला मुलांसोबत एक खेळ घेतला आणि मग ‘सुट्ट्यांमध्ये आपण काय करू शकतो?’ यावरून गटासोबत चर्चा सुरु करण्यात आली. आधीच ठरवल्याप्रमाणे मुलांनी विशेष करून ‘मैत्री, उन्हाळा आणि आजी-आजोबा’ या आणि इतर विषयांवर बरेच कृतिकार्यक्रम सुचवले व ते कसे करता येतील यावरही चर्चा केली. मुलांनी एकटयाने करता येणारे तसेच गटात करता येतील असे छान कृतिकार्यक्रम सुचवले.


कृतिकार्यक्रम
·       आर. ओ. फिल्टरचे पाणी वाया जातं, ते भांडी,कपडे धुण्यासाठी वापरू शकतो.
·     उन्हामुळे रस्त्यांवरील किंवा गरीब मुलांना त्रास होतो त्यामुळे आपल्याकडे जर जादा चप्लिचे जोड असतील तर आपण ते या मुलांना देऊ शकतो तसेच जमलं तर कपडेही देऊ शकतो.
·       उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना सावलीत दाणे आणि पाणी ठेऊ शकतो
·       वापरलेले पाणी फेकण्यापेक्षा झाडांना टाकणे 
·       दुपारी फावल्या वेळात नवनवीन खेळ शोधून काढणे 
·       मित्रांसोबत एकत्र बसून किंवा एकटयाने पुस्तकं वाचणे 
·       घरातील काही कामे शिकणे (स्वैपाक, बाजारातील खरेदी, बँकेची कामे इ.) 
·       आजी-आजोबाना स्वतःच्या हाताने काहीतरी सरप्राईज गिफ्ट बनवून देणे 
·       आजी-आजोबांकडून जुन्या गोष्टी-गाणे ऐकणे व लिहून घेणे 
·       जवळच्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या आजी-आजोबाना भेटणे, त्यांच्यासोबत खेळणे आणि गप्पा मारणे 
·       सुट्टीत नवीन मित्र बनवणे 
·       मित्रांसोबत मज्जा-मस्ती करणे, खूप खेळणे इ. इ.

चर्चेनंतर मुलांनी एका कार्डशीट वर वरील सर्व कृतिकार्यक्रम एकत्रितपणे लिहून काढले आणि आपापल्या वहीतही लिहिले. सुट्ट्यांमध्ये जे काही कृतिकार्यक्रम केले जातील त्याचे अनुभव व शेअरिंग मुलांनी या वह्यांमध्ये लिहिण्याचे ठरवले. शिबिराचा शेवट ‘इहा..’ या खेळाने करावा हे मुलांनी आधीच ठरवल्याने शिबिराचा शेवट ‘इहा..’ या खेळाने झाला.

शिरूर गट
शिरूर येथील डॉ. सोनाली हार्दे आणि त्यांच्या काही मैत्रिणींनी मिळून ३० ते ४० मुलांचा शिरूरमध्ये गट तयार केलाय. हा गट मुलांसाठी संस्कार वर्ग चालवतात व त्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम करतात. गटातली मुले खूप अॅक्टीव आहेत. तिथल्या मुलांसोबत ‘उन्हाळी कुमार निर्माण’ हा उपक्रम घेतला.

२८ एप्रिलला आम्ही (प्रणाली, शैलेश आणि श्रुती) संध्याकाळी ४ वाजता शिरूरला पोचलो. ४थी ते ५वी च्या वयोगटातील साधारण २२ मुले-मुली जमली होती. मुलांसोबत त्यांचे काही महिला पालक आणि सोनाली ताईंचा मैत्रिणींचा गटही जमला होता. आम्ही तिथे काय करणार आहोत याविषयी मुलांमध्ये खूपच कुतूहल होतं.
सुरवातीला मेमरी गेम घेऊन मुलांशी व कार्यकर्त्यांशी ओळख करून घेतली. मुलांनी खेळाचा खूप आनंद लुटला आणि त्यामुळे ती बऱ्यापैकी खुलली. नंतर मुलांचे ३ गट करून ‘आपण सुट्ट्यामध्ये काय काय करू शकतो?’ यावर प्रत्येक गटात बसून चर्चा केली. नेचर गटाप्रमाणे याही गटात ‘मैत्री, उन्हाळा आणि आजी-आजोबा’ या ३ गोष्टींवर जास्त भर देण्यात आला. चर्चेदरम्यान मुलांनी बऱ्याच गोष्टी सुचवल्या ज्याचे कृतिकार्यक्रम होऊ शकतात. प्रत्येक गटाने सुचवलेले कृतिकार्यक्रम एकत्रितपणे फळ्यावर लिहिले व ते कशाप्रकारे करता येतील यावर चर्चा केली. ही मुले बरीच अॅक्टीव असल्याने त्यांनी खूप चांगले असे कृतिकार्यक्रम सुचवले.

कृतिकार्यक्रम
मित्र-मैत्रिणींनी मिळून फिरायला जाऊन मोठया व्यक्तीच्या मदतीने आकाश दर्शन करणे 
·       आपल्या लहान भावंडासोबत खेळणे तसेच शेजारच्या लहान मुलांसोबत खेळणे 
·       स्वतः पाणी कमी वापरणे व इतरांनाही पाण्याचे महत्व समजावून सांगणे 
·       ओला व सुका कचरा वेगळा करणे 
·       आर. ओ. फिल्टरचे पाणी वाया न जाऊ देता त्याचा वापर करणे 
·       पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवणे 
·       वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये रोपे लावणे 
·       सगळ्या मित्रांनी मिळून कागदी पिशव्या बनवणे व त्या स्वतःसोबत घरातल्यांनाही वापरायला सांगणे 
·       घरच्या झाडांना पाणी घालणे 
·       पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी बिया जमवणे 
·       आपल्या आजी-आजोबांना तसेच शेजारच्या आजी-आजोबांना मदत करणे 
·       आजी-आजोबांना वेळ देणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे, त्यांना छानसं पत्र पाठवणे 
·       अनाथ आश्रमास भेट देऊन तिथल्या  मुलांसोबत खेळणे आणि त्यांना पुस्तके भेट देणे 
·       सुट्ट्यांमध्ये आपले छंद जोपासणे 
·       नवीन मित्र बनवणे इ. इ.

नंतर मुलांना घरी स्वतःजवळ ठेवण्यासाठी वह्या दिल्या ज्यात मुलांनी तिन्ही गटांनी सुचवलेले कृतिकार्यक्रम लिहून घेतले. आणि  मुलांनी आम्हाला यातले जे जे काही शक्य होईल ते ते सुट्ट्यांमध्ये करण्याचे प्रॉमिस केले. संपूर्ण वेळ मुलांचा उत्साह खूपच भन्नाट होता.मुलांनी सुचवलेल्या कृतिकार्यक्रमांमध्ये गटाने तसेच एकटयाने करता येणारे कृतिकार्यक्रम होते. नंतर शैलेशने कार्यकर्त्याना एका छोटया अॅक्टीविटीच्या मदतीने कुमार निर्माणची ओळख करून दिली.
मुलांच्या इच्छेप्रमाणे ‘प्रश्न विचारू पुन्हा पुन्हा’ या गाण्याने सेशनचा शेवट झाला. सुरवातीला अनोळखी असलेल्या मुलांनी शेवटी निघताना ‘पुन्हा आमच्याकडे नक्की या’ असं बजावून सांगून आम्हाला आपलसं करून घेतलं. एकूण नवीन मुलांसोबतचा अनुभव खूपच छान होता आणि अर्थातच आम्हालाही नवीन मित्र मिळाले.

दोन्ही गटातील मुलांना ‘उन्हाळी कुमार निर्माण’ ची संकल्पना खूप आवडली. दोन्ही गट जे कृतिकार्यक्रम करणार आहेत त्याचे अनुभव शेअरिंगचे शिबीर जून मध्ये आयोजित करण्यात आले आहे. एकूण सर्वच मुलांचा सहभाग आणि प्रतिसाद खूप उत्साही होता.

गट भेट- इंदापूर

इंदापूरच्या सक्षम गटाने केलेले कृती कार्यक्रम जाणून घेण्यासाठी आणि सक्षम गटासोबत गप्पा मारण्यासाठी आम्ही सोमवारी दुपारी भर उन्हात इंदापूरला पोहचलो. तेथे मुले आमची वाट बघत हॉल मध्ये थांबलेली होती. आम्ही मग मुलांशी ओळख करून घेतली आणि गप्पा मारायला लागलो. कुमार निर्माण अंतर्गत सक्षम गटानी केलेले कृती कार्यक्रम मुलांनी आम्हाला सांगितले. या गटाने गावातील कचरा साफ करायचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी नगर परिषदेच्या इमारतीसमोरील कचरा उचलला व पुतळ्यांची सफाई केली. सफाई करतानी सुरवातीला त्यांना लाज वाटत होती पण नंतर त्यांचे काम बघून इतरलोकही त्यांच्या मदतीला आले. मग मात्र त्यांनी मन लावून काम केले. सफाई करून झाल्यावर या मुलांनी सफाई कामगारांना पुष्पगुच्छ देऊन thank you म्हटले.

 सक्षम गटातील बरीच मुले सुट्टी असल्याकारणाने बाहेर गावी गेलेली होती. गटातील नेहमीच्या मुलांसोबतच इतर उत्सुक मुलेही बैठकीस हजर होती. गप्पागोष्टी करता करता मग या सर्व मुलांनी कुमार निर्माण म्हणजे काय हे समजून घेतले. ही मुले मग कुमार निर्माण च्या संघासोबत काम करण्यास उत्सुक होती.


मुलांनी आम्हाला त्यांच्या कामाविषयी बनवलेली ppt दाखविली. नंतर आम्ही मुलांसोबत खेळ खेळलो आणि मुलांचा निरोप घेतला. मग आम्ही कुमार निर्माणचे इंदापूरच्या सक्षम गटाचे निमंत्रक श्री. रांजणकर सरांसोबत गप्पा मारल्या. त्यांचे इतर उपक्रम बघून आम्ही तेथून निघालो.