Thursday, 31 March 2016

उल्लेखनीय कृती कार्यक्रम

सृजन गट कुरूळ, अलिबाग


कुरूळ अलिबाग येथील गटाने परिसरातील कचऱ्याचा प्रश्न दोन वर्षांपासून उचलून धरला आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले आहेत. या गटाने हा प्रश्न कसा निवडला आणि तो सोडवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, त्यांना कोणी मदत केली आणि कोणी नाही केली ऐकुया त्यांच्याच शब्दांत.

आम्हाला सरांनी कुमार निर्माण विषयी सांगितले आणि त्यात आपण आपला परिसर ज्यात आपण स्वतः पण येतो अजून चांगला सुंदर आणि आहे त्या पेक्षा एक पाऊल पुढे कसा नेऊ शकतो या साठी प्रयत्न करतो असे सांगितले. कुमार निर्माणच्या गटात काम करण्याची कोणाची इच्छा आहे असे विचारताच आम्ही हात उंचावले आम्हाला गटात उपक्रम  राबवायला आवडतील असे सांगितले. अशा प्रकारे आम्ही कुमार निर्माणच्या गटात सामील झालो.

गटात काय कृती करायची जेणे करून परिसरात काही तरी चांगला बदल घडेल याचा आम्ही विचार करू लागलो. आमच्या शाळेसमोरच एक खड्डा आहे आणि परिसरातील लोक त्या खड्ड्यात कचरा टाकतात त्यामुळे घाण वास येतो आणि त्याचा त्रास शाळेतील मुलांना होतो. म्हणून आम्ही या खड्ड्यातील कचरा साफ करायचे असे ठरवले. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती निमित्त आम्ही या खड्डातील कचरा साफ केला. परिसरातील लोकांनी परत खड्ड्यात कचरा टाकू नये म्हणून आम्ही घरोघरी  जाऊन लोकांना सागितले की या खड्ड्यात कचरा टाकू नका. तुम्ही कचरा टाकला नाही तर तुम्हालाही त्रास होणार नाही आणि आम्हालाही त्रास होणार नाही. घरातील कचरा घंटा गाडीत टाका असेही सांगितले. त्यावेळेस सगळे लोक आम्हाला हो म्हणाले. पण नंतर परत खड्ड्यात कचरा टाकू लागले आणि पुन्हा परिस्थिती पहिल्या सारखी झाली.

खड्ड्यातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मग ही मुले ग्रामपंचायत कडे गेली आणि त्यांना या विषयी निवेदन दिले. ग्रामपंचायत चे अधिकारी म्हणाले की तुम्ही मुले लहान असूनही जर एवढे प्रयत्न करताय तर आम्ही पण नक्की मदत करू. ग्रामपंचायतने तीथे दोन कचराकुंड्या बसवल्या. तरही काही लोक कचरा कचरा कुंडीच्या बाहेरच टाकत. मग आम्ही परत त्या लोकांना सांगायला गेलो की कचरा बाहेर टाकता कचरा कुंडीतच टाका. या वेळेसही घरोघर जाऊन आम्ही सगळ्यांना समजून सांगितले. परिसरातील लोकांना आम्ही कागदाच्या कापडी पिशाया घरी बनवून वाटल्या. त्यांना सांगितले की प्लास्टिक च्या पिशव्या न वापरता बाजाराला किंवा खरेदीला जाताना या कापडी पिशवा वापरा. गावातील तळ्याजवळील लोकांनाही मुलांनी या पिशव्या दिल्या आणि महत्व समजावून सांगितले. त्यांनाही तळ्यात कचरा टाकण्याची विनंती मुलांनी केली.

गटाच्या या प्रयत्नांनी खड्ड्यातील कचरा कमी होण्यास चांगलीच मदत झाली. पण तरीही काही लोक खड्ड्यात कचरा टाकतातच. त्यावर मुलांनी मग त्यांच्या वार्षिक स्नेह संमेलनात एक नाटिका सादर करायचे ठरवले. गटातीलच एका मुलीने या साठी नाटक लिहले आणि त्यांनी ते वार्षिक स्नेहसंमेलनात सर्व गावकर्यांसमोर सादर केले.
शब्दांकन -  कुमार निर्माण  टीम

खड्ड्यातील कचऱ्याच्या प्रश्नाची तीव्रता जरी आता कमी झाली असली तरी अजून प्रश्न पूर्णपणे संपलेला नाहीये. यावर अजून काय उपाय करता येयील या विषयी गटाचा विचार सुरु आहे. पुढील प्रयत्नांसाठी कुमार निर्माण तर्फे गटाला शुभेच्छा.  


जागृती गट, डोमरी

जागृती गटाच्या प्रसाद आणि प्रतिक यांनी शाळेतील मुलांना  ग्रह तारे टेलिस्कोप च्या मदतीने दाखवून त्या विषयीची अधिक माहिती द्यायची ठरवले. एक महिना तयारी करून पुस्तके, इंटरनेट इतर साहित्याची मदत घेऊन  त्यांनी स्वतः पूर्ण अभ्यास केला. स्वतः टेलिस्कोप  मधून निरीक्षण केले. अशा प्रकारे पूर्व तयारी  पूर्ण झाल्या नंतर त्यांनी ४० मुलांना टेलिस्कोप च्या मदतीने चंद्र इतर तारे दाखवले आणि त्या विषयी माहिती समजावून सांगितली. त्यांनी मुलांना या वेळेस चंद्र आणि गुरु ग्रहाबद्दल माहिती सांगितली. मुलांना चंद्र आणि गुरु ग्रहाबद्दल अधिक माहिती तर या उपक्रमातून मिळालीच पण त्या सोबतच मुलांना टेलिस्कोप हाताळायलाही मिळाला. रात्रीच्या शांत वातावरणात निरभ्र आकाशातील ग्रह तारे टेलिस्कोप मधून पाहायला मिळणे ही मुलांसाठी एक आनंदाची पर्वणीच ठरली.


बालीवली गट, वाडा

कोहोज नावाचा एक गड बालीवली येथून जवळपास ५० किमी  अंतरावर  आहे. या गडावर  उंचावर एक महादेवाचे मंदिर आहे. येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते.  त्या यात्रेस जवळपास पाच हजार लोक येतात. यात्रेनंतर तेथे भरपूर कचरा आणि प्लास्टिक पडलेले असते. हा कचरा उचलण्यासाठी गटातील मुले आणि गट निमंत्रक या गडावर  गेले होते. सकाळी  लवकर निघून हे लोक गडावर पोहोचले. पहिले ते गड चढून वरती गेले. तिथे त्यांनी डब्बे खाल्ले. नंतर गटाने मिळून  कचरा प्लास्टिक उचलले. सगळे प्लास्टिक गोळा करून ते त्यांनी गोण्यांमध्ये भरले. अशा त्यांनी आठ गोण्या भरल्या. हा कचरा प्लास्टिक चा असल्याने त्यांनी तो जाळला नाही तर त्यांनी त्या गोण्या तिथेच मोठ्या दगडांखाली दाबून ठेवल्या जेणे करून हा कचरा इतरत्र पसरणार नाही. विशेष म्हणजे या कृती मध्ये आताच्या कुमार निर्माणच्या गटातील मुले तर होतीच, पण त्याच सोबत मागील वर्षी गटात असणारी आणि आता गटात नसणारी अशी आठ मुले पण होती. या सगळ्यांनी मिळून तो परिसर प्लास्टिक मुक्त केला


सारथी गट, पवनी

पवनीच्या ‘सारथी गटा’च्या ३ महिन्यांपूर्वीच्या बैठकीत काही मुलांनी असे मत मांडले की, ‘बसमधून प्रवास करणारे प्रवासी काहीही खाल्लं की सरळ खिडकीतून बाहेर फेकतात, तिकिटे सुद्धा प्रवास झाला की रस्त्यावर फेकतात’. मग यावर चर्चा झाली आणि गटाने ठरवले की पवनीतून सुटणाऱ्या सगळ्या बसेसमध्ये कचऱ्याच्या पेटया ठेवायच्या आणि तिथे जाऊन लोकांना सांगायचं की कचरा या पेट्यांमध्येच टाका. परंतु जेव्हा मुलांनी कंडक्टरना भेटून विचारले तेव्हा त्यांनी मुलांना उडवून लावले. ‘सगळ्या बसेसमध्ये आपण कचरापेट्या ठेवणं शक्य नाही’, असा विचार करून मुलांनी तो विषय डोक्यातून काढला. परंतु जेव्हा गटाच्या बैठकीत पुन्हा त्याच विषयावर चर्चा झाली तेव्हा मात्र मुलांनी ठरवलं की ‘जरी आपण सर्व बसेसमध्ये कचरापेट्या नाही ठेवू शकलो तरीही काही ठराविक ठिकाणी आपण त्या पेटया नक्कीच ठेवू शकतो.’

मागील महिन्यात मुलांनी खोक्यांना सजवून, त्यावर ‘कुमार निर्माण’चे नाव टाकून त्याच्या कचरापेटया बनवल्या. शाळा ते बस स्थानकापर्यंत रॅली काढून गावातील लोकांना साठलेल्या कचऱ्यामुळे होणाऱ्या दुष्परिनांमाविषयी सांगून स्वच्छतेचा संदेश दिला. यासोबतच काही ठराविक दुकानांच्या समोर (जिथे मोठया प्रमाणावर कचरा असतो), बस स्थानक तसेच पवनी-नागपूर बसेसमध्ये मुलांनी बनवलेल्या कचरापेट्या ठेवल्या व तेथील लोकांना त्यातच कचरा टाकण्याची विनंती केली.

एका ठिकाणी कचरापेटी ठेवताना मुलांना एक गृहस्त खर्रा खाताना दिसले. त्याबद्दल मुलांनी लिहिलेले त्यांच्याच शब्दात,

“कचरापेटी ठेवण्यासाठी आम्ही एका दुकानात गेलो. तेथे एक काका व्यसन करत होते. त्यांना आम्ही सांगितले की कृपया तुम्ही व्यसन करू नका कारण त्यामुळे कर्करोग होतो. त्यामुळे तुमच्या मूला-बाळांवरही वाईट परिणाम होतील. असं सांगितल्याबरोबर त्यांनी आपल्या तोंडातून सगळा खर्रा थुंकला व मी आजपासून कधीच व्यसन करणार नाही असे सांगितले. हे ऐकून आम्हाला खूप आनंद वाटला. आणि आजच्या कचरापेट्या ठेवण्याच्या व त्याचे दुष्परिणाम लोकांना समजावण्याच्या कामात आम्हाला यश मिळालं. आमचा हा अनुभव खूप चांगला होता व यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.”

सारथी गट, पवनी
गट निमंत्रक: वृंदन बावनकर (९७६६३७०९५९)



मुलांच्या लेखणीतून

एके दिवशी सहज फिरत असताना एका चिमणीचे पिल्लू मला दिसले, त्याचे डोळेही नीट उघडलेले नव्हते पण ते थरथर कापत होते. मला त्याची दया आली. मी त्याला अलगद उचलले व एका मऊ बिछान्यावर त्यास ठेवले. कुत्रा, मांजर यासारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून बचाव व्हावा यासाठी त्याला एका पिंजऱ्यात ठेवले. पिंजऱ्यामध्ये एका वाटीत पाणी व भिजवलेले तांदूळही ठेवले. मी दररोज त्याची काळजी घेऊ लागलो. मला या गोष्टीचा ताण न येता मला त्यात आनंद येऊ लागला.

थोडे दिवस गेले व ते पिल्लू आता जरा दिसू लागले. ते थोडे थोडे उडू लागले व चालू लागले हे पाहून मला बरे वाटले. २-३ दिवसानंतर मी त्याला पिंजऱ्याबाहेर सोडले तेव्हा ते थोडे थोडे उडू लागले. मग मी दुसऱ्या दिवशी त्याला सोडून दिले व ते पिल्लू पाहिले एका लहान झाडावर बसले आणि उडून गेले.

मला पशुपक्षी पाळण्याचा छंद आहे पण तो आत्तापर्यंत छंदच होता. यावेळी मी पक्षाची काळजी घेतल्याचा मला आनंद झाला. तसेच एके दिवशी मला हौदात एक खारुताई पडलेली दिसली. तिचे अंग पाण्याने भिजलेले दिसले. ती फार थरथरत होती. मला थोडे वाईट वाटले, मग मी तिला वाचवायचे ठरवले पण कसे वाचवावे हे सुचत नव्हते. नंतर मी एक बकेट घेतली व त्या खारुताईला अलगद पाण्याबाहेर काढले. तिचे अंग खूप भिजले होते. त्यामुळे ती थरथर कापत होती. तिला चालताही येत नव्हते. मग मी तिला एका पिंजऱ्यात ठेवले आणि तिला २ ते ३ तास थोडे-थोडे खाऊपिऊ घातले. मग तिला हळूहळू बरे वाटले व ती तरतरीत झाली. आणि शेवटी मी तिला सोडून दिले. मला हे सर्व करताना फार आनंद झाला. एका मुक्या प्राण्याची आपण काळजी घेतली याचाही खूप खूप आनंद झाला.
आकाश जऱ्हाड
जागृती गट, डोमरी
गटनिमंत्रक: रज्जाक पठाण (९४२२७१२४४६)

अनुभव एका निमंत्रकाचा - स्मशानभूमीला भेट

फेब्रुवारी महिन्यात आमच्या कुमार निर्माण गटाने शाळेजवळच्या स्मशानभूमीला भेट दिली. त्याबाबत थोडा वृतांत .

मुलांची भीती घालवणे, हा शिक्षणाचा एक भाग असला पाहिजे, असे मी समजतो. कारण मी बघत आलोय की , लहानपणापासून मुलांच्या मनावर मृत्यू,प्रेत वा स्मशान याबाबत भीतीचे संस्कार घडवले जातात. अगदी लहानपणी मीसुद्धा अशाच वातावरणातून घडलेला आहे.

माझ्या शाळेपासून स्मशानभूमी साधारण १५० ते २०० मी अंतरावर आहे. स्मशानभूमी व नदी लागूनच असल्याने शाळेतील मुलांचा तेथून वावर सारखा असतो. तरीसुद्धा मरण पावलेल्या व्यक्तिविषयी त्यांच्या मनात असलेली अनामिक भीती मला जाणवून यायची.

आमच्या वाडीत एक आजी वारल्या. दुसर्‍या दिवशी मुलांना विचारले,  

"स्मशानात जाऊया का सर्वांनी?" आमचा बारा जणांचा गट. मुलांनी उत्साहाने होकार दिला खरा, पण काही घाबरून गेलेल्या नजरा मला जाणवत होत्या. "न घाबरणारी मुलेच माझ्याबरोबर चला", मी मुलांसमोर पर्याय ठेवला. सानिकाने फक्त नकार दर्शवला. आम्ही सर्वांनी तिची भीती घालवण्याचा प्रयत्न केला. पण ती यायला तयार झाली नाही. तिच्या निर्णयाचा मान राखून आम्ही सर्वजण स्मशानभूमीकडे निघालो.

चिता अजूनही धुमसत होती.तरीसुद्धा तेथे आम्ही थोडा वेळ थांबलो. आजूबाजूचे निरीक्षण केले.भूताविषयी गप्पा मारल्या. मुलांच्या भुताच्या कल्पना जाणून घेतल्या. प्रत्येक मुलांच्या मनातील भूत वेगळे होते. पाय नसलेले, हात नसलेले, पांढरे, उलट्या पायाचे, काळे असे अनेक प्रकार मुलांनी सांगितले.

"कोणी प्रत्यक्ष भूत बघितले आहे काय?" – मी.

"नाही"मुले. 

"मग तुम्हाला कसे कळले भुताविषयी?" मी विचारले.

घरातील मोठी माणसे, शेजारी, नातेवाईक अशा लोकांची नावे मुलांनी सांगितली.

शाळेत आल्यावर मुलांना भूताचे चित्र काढायला सांगितले. मुलांनी ऐकीव गोष्टीप्रमाणेच भूताचे चित्र रेखाटले. मी  विचारले, “मरणारी माणसे दिसायला सारखी असतात, मग तुमची भूते वेगवेगळी कशी?” त्यांना नीट उत्तर  देता आले नाही.  मग भूत असते वा नसते, यावर मुलांचे वाद-विवाद झाले.काही मोजक्या मुलांच्या रेट्यामुळे शेवटी अनेकांनी मान्य केले कि भूत नसते.

 दोन दिवसांनी कातभट्टीला भेट द्यायला जाताना स्मशानभूमीच्या वाटेनेच गेलो. आज मात्र बहुतेक सगळेजण बिनधास्त दिसत होते. मुलग्यांनी राखेमधील हाडे हातात घेऊन बघितली.एकमेकांच्या हातात देवू लागले. सापडलेले हाड शरीरातील कोणत्या ठिकाणचे असेल , याचा अंदाज घेऊ लागले. मुलींना मात्र हाडे हाताळायचा संकोच वाटला. आपल्या शरीरात हाडे किती असतात, कोणते हाड कुठे असते, याविषयी आमच्या गप्पा सुरू झाल्या. नुकत्याच जन्मलेल्या मुलाला मोठ्या माणसापेक्षा जास्त हाडे असतात, हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले.

 हाडे-फॉस्फरस, दात- सोडियम याविषयी सुद्धा चर्चा झाली.स्मशानात काहीवेळा आपोआप हाडे पेट घेतात,यामध्ये भूताचा प्रताप नसून फॉस्फरस धातूची करामत कशी असते,हेही मुलांना पटवून सांगता आले.

विघ्नेशने तेथे लावलेल्या तुळशीच्या झाडाविषयी विचारले. एकाद्याचा मृत्यू झाल्यानंतर तिसर्‍या, पाचव्या किंवा सातव्या दिवशी 'सारी भरणे' या विधीच्या वेळी छोट्या खडयात काही अस्ती ठेवून त्यावर तुळशीचे झाड लावले जाते, ही प्रथा त्यांना सांगितली. "तुळशीचे झाडच का लावले जाते?" मीच प्रश्न केला. मग आम्ही अंदाज बांधला की एकतर तुळस ही जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याकारणाने व झाडाच्या रूपात गेलेले माणूस मागे उरावे, अशाच हेतूने तुळस लावली जात असावी. आम्ही पहिले की लावलेल्या सगळ्या तुळशी सुकून गेल्या होत्या. म्हणून मुलांना मी म्हटले, "तुळस ही आठवण म्हणून घराजवळच लावल्या गेल्या असत्या तर किती तुळशी जगल्या असत्या. नाही का?"

या क्षेत्रभेटीत पुस्तकाबाहेर खूप काही शिकलो. मी सुद्धा आणि मुले सुद्धा.
                                     
                                      सुहास शिगम
                                     लांजा, रत्नागिरी

                                      9960549414

कुमार गीत

गांव छोडब नहीं.. जंगल छोडब नहीं..
माय माटी छोडब नहीं.. लडाई छोडब नहीं।।धृ।।

बांध बनाये, गांव डूबोये, कारखाना बनाये,
जंगल काटें, खदान फोड़े, सेंचुरी बनाये
जल जंगल जमीन छोड़ी हमिन कहाँ कहाँ जायें
विकास के भगवान् बता हम, कैसें जान बचाएं
हां भाई कैसें जान बचाएं।।।।

जमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा,
गंगा बनी गंदी नाली, कृष्णा काली रेखा
तुम पियोगे पेप्सी कोला बिस्लरी का पानी
हम कैसे अपना प्यास बुझाये पीकर कचरा पानी
हां भाई पीकर कचरा पानी।।।।

पुरखे थे क्या मुरख जो ये जंगल को बचाएं
धरती राखी हरी भरी, नदी मधु बहाए
तेरी हवस में जल गयी धरती, लुट गयी हरियाली
मछली मर गयी, पंछी उड़ गए जाने किस दिशाएं
हां भाई जाने किस दिशाएं ।।।।

मंत्री बने कंपनी के दलाल हम से जमीन छिनी
उनको बचाने लेकर आये साथमे पलटनी
अफसर बने है राजा ठीकेदार बने धनि
गाँव हमारे बन गयी है इनकी कलोनी
हां भाई इनकी कलोनी।।।।

बिरसा पुकारे एकजुट होवो छोडो ये ख़ामोशी
मछावारे आवो, दलित आवो, आवो आदिवासी
खेत खलिहान से जागो नगाड़ा बजाओ
लड़ाई छोड़ी चारा नहीं सुनो देशवासी
हां भाई सुनो देशवासी।।।।

हे कुमार गीत बघण्यासाठी खालील विडीयो बघा




गोष्ट - कुत्र्याचे पिल्लू

सकाळपासून पावसाची धार लागली होती आणि रस्त्यावर खूप चिखल झाला होता. पाणीही साचले होते कितीतरी ठिकाणी.गटाराच्या कडेला एक कचऱ्याची पेटी होती. तिच्या बाजूला एक कुत्र्याचे पिल्लू बसले होते. अगदी लहानसे आणि हाडकुळे. भिजून चिंब झाले होते बिचारे, आणि कुडकुडत होते. त्याच्या डोळ्यांवरून पाणी ओघळत होते, तरी किलकिलत्या डोळ्यांनी ते वर बघे, आपली चिमुकली शेपटी हालवी आणि आणि ‘क्यांव क्यांव’ करी; अगदी केविलवाण्या स्वरात!

चिंतू घराच्या उंबऱ्यावर बसला होता, रस्त्यातील पाण्यात अर्धे पाय बुडवून कागदाच्या नवा सोडीत. एकदम त्याच्या सदऱ्याला हिसका बसला आणि पोटरीला कोणीतरी ओरबाडल्यासारखे वाटले. त्याने दचकून खाली पाहिले, तो कुत्र्याचे पिल्लू! ‘क्यांव क्यांव’ करीत होते. इवलेसे त्याचे ते पंजे.  चिखलाने भरलेले, पण त्यांनीच ते चिंतूच्या पायांशी सलगी करीत होते. किलकिल्या डोळ्यांनी चिंतूकडे त्याने पाहिले, आणि ‘क्यांव क्यांव’ केले
.
चिंतूने आपल्या कागदाच्या नाव फेकून दिल्या आणि पिल्लाला हातावर अल्लद उचलून घेतले. त्याचा सदरादेखील भरला चिखलाने. धावत धावत तो पडवीत गेला.

“दादा, दादा, आपल्याला कुत्र्याचं पिल्लू...”

“चिंत्या, लेका काय रे आणलंस ते? देतोस फेकून – का येऊ?”

चिंतू जीव घेऊन मागील दारी पळाला. आयाई गं! बिचारं पिल्लू! म्हणे फेकून देतोस का येऊ! चिंतू स्वैपाकघरात गेला, “आई, आई, हे बघ काय आणलंय मी!”

“चिंत्या – मेल्या, अरे हड् हड्! इथं कशाला आणलंस? काय करावं या पोरट्याला. वाट्टेल ते घेऊन येतो रस्त्यावरचं! अहो...”

चिंतूने धूम ठोकली गोठयाकडे. गोठयाच्या एका कोपऱ्यात देवदारी खोके होते, त्यात चिंध्या पडल्या होत्या पुष्कळ. चिंतूने पिल्लाला नीट पुसून स्वच्छ केले. किती छानदार पिल्लू आहे! पांढरे सफेद – आणि कपाळावर काळा डाग पण! आणि म्हणे रस्त्यावरचे काहीतरी घेऊन येतो! पलीकडे एक रिकामी  पणती पडली होती. चिंतूने त्यात थोडेसे पाणी भरून आणले. पिल्लाने ते लप लप करीत पिऊनदेखील टाकले. चिंतूच्या मनगटावर पुढचे दोन पंजे ठेऊन ते उभे राहिले, आणि शेपटी हालवीत भुंकले. किती छान! भू भू भू ! अरे हात! चिंतूच्या पोटात धस्स झाले! बाबांनी ऐकले तर! त्याने चटकन मागे येऊन पाहिले.

“चिंत्या, कारटया, हे धंदे करतोस काय! कुठल्या उकीरड्यावरून आणलंस हे?” चिंतूच्या काळजाचे अगदी अगदी पाणी पाणी झाले! पण पिल्लू असे भुंकले रागाने! भू भू ! आणि चिंतूका चिकटले.

“चल, हो घरात! अभ्यास नको करायला!” चिंतूच्या वडिलांनी त्याचा कान पकडला आणि दुसऱ्या हाताने पिल्लाची मानगूट धरली आणि त्याला वर उचलले.

“अहो, दुखेल त्याची मान – ” चिंतूचे शब्द त्याच्या घशातच अडकले. त्याचा गळा भरून आला – ‘क्यांव क्यांव’ पिल्लाने टाहो फोडला. आतून डोके फुटते आहे, असे चिंतूला वाटले.

“चल घे ते पुस्तक – मरेना कुत्रं! अभ्यास करायला नको –”

चिंतूच्या पाठीत जोरात रपाटा बसला, पण त्याने पाठदेखील चोळली नाही. त्याच्या डोक्यात नुसते ‘क्यांव क्यांव’ चालले होते.

“हं, उघड पुस्तक. पान पंचविसावे. धडा पंधरावा. ‘प्राण्यांवर दया करा!’”

चिंतूच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा चालल्या होत्या. त्याने डाव्या बाहीने नाक पुसले व तो रडक्या आवाजात वाचू लागला,  “पान पंचविसावे. धडा पंधरावा. ‘प्राण्यांवर दया करा!’”

बाहेर दरवाज्यापाशी कुत्र्याचे पिल्लू आपले उभेच होते. पावसाने भिजल्यामुळे थरथर काकडत! आणि चिमुकल्या नखांनी दाराला ओरबाडीत! पावसाची धार कोण चालली होती आणि इकडे चिंतूचे वाचनही चाललेच होते,


“प्राण्यांवर दया करा!”

(आचार्य अत्रे लिखितकुत्र्याचे पिल्लूया गोष्टीवरून)

सर्वांसाठी आवाहन

सर्वांसाठी आवाहन
· भरारी हे आपणा सर्वांचे असून तुम्हीही त्यात सहभाग घेऊ शकतात नव्हे घ्यायलाच हवा.

· मुलांनी, निमंत्रकांनी आणि पालकांनी आपले लेख, चित्रं, गोष्ट, कविता,अनुभव, फोटो ई. जे भरारी मध्ये समाविष्ट केले जाऊ शकेल ते आम्हाला पाठवा.

· कृती कार्यक्रमाशी संबंधित अनुभव आम्हाला पाठवताना ज्या कृती कार्यक्रमाला अपयश आलं किंवा ठरवूनही झाला नाही असे कृती कार्यक्रमही आम्हाला नक्की पाठवा.

· भरारी मधील चित्र, गोष्ट, इतरांचे कृती कार्यक्रम यावर गटात काय चर्चा झाली ते आम्हला कळवा.

·  मुलांनी, निमंत्रकांनी आणि पालकांनी कुमार निर्माण शी संबंधित कुठलाही प्रश्न, सूचना किंवा अडचणी आम्हाला नक्की पाठवा/ विचारा.

संपर्कासाठी मोबाईल नंबर अंकात दिलेले आहेत.


चित्र चर्चा

 खालील चित्र पाहून काय वाटते? चर्चा करा. यावर एखादी गोष्ट रचता येईल का?