Sunday 31 January 2016

निर्णय घेताना


रोजच्या जगण्यात आपण अनेक लहान मोठे निर्णय घेत असतो. हे निर्णय लहान सहान असतात आणि म्हणून आपण जास्त विचार न करता चटकन निर्णय घेऊन मोकळे होतो. पण जेव्हा अचानक एखादी समस्या किंवा अडचणीचा आणि रोजच्या जीवनाचा भाग नसलेला प्रसंग आपल्या समोर अचानक उभा राहतो. तेव्हा आपण गोंधळून जाऊन योग्य निर्णय न घेता घाई घाईने चुकीचा निर्णय घेऊन समोरची परिस्थिती आणखीनच बिघडवून ठेवतो. अशा वेळेस जर शांतपणे विचार करून निर्णय घेतले तर योग्य निर्णय घेतल्या जाऊ शकतो.
अशा परिस्थितीत निर्णय घेण्याचा सराव जर आपण काही असे प्रसंग उदाहरण म्हणून घेऊन मुलांकडून करून घेतले तर त्याचा फायदा मुलांना नक्कीच होईल.
यासाठी गटात एखादी परिस्थिती देऊन या परीस्थितीत तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारावा.
‘घरात भावंड खेळत असताना काचेचे भांडे खाली पडून फुटले.’ यावर मुलांना तुम्ही काय कराल असे विचारले असता मुले विचार करून किंवा चर्चा करून अनेक पर्याय सुचवतील.
जसे की, ‘सगळ्या काचा जमा करून फेकून देईल. म्हणजे कोणालाच कळणार नाही.’, ‘आई ला सांगेन.’, ‘मार चुकवण्यासाठी भावाने किंवा बहिणीने भांडं फोडलं असं सांगेन.’, ‘भांडं मांजरीने पाडलं असं सांगेन.’, ‘आई मारेल म्हणून आधी बाबांना सांगेन.’ इ. इ.
अशा प्रत्येक पर्यायावर चर्चा करून कोणता पर्याय वापरल्याने काय परिणाम होऊ शकतो आणि म्हणून नेमका कोणता पर्याय निवडावा यावर चर्चा करावी.
वयोगटाप्रमाणे चर्चेसाठी वेगवेगळे प्रश्न निवडता येतील. माध्यमिकच्या मुलांसाठी ‘बाबा सहलीला जाण्यासाठी पैसे देत नाहीयेत.’ ‘एक जण पाण्यात बुडतोय आणि तुम्हालाही पोहता येत नाही.’ ‘आपल्या लहान भावाला त्याच्या वर्गातील मुलांनी मारलं, आणि त्याने रडत तुमच्याकडे येऊन तक्रार केली.’ ‘तुम्हाला तुमचा आवडता सिनेमा बघायचाय पण नेमके घरी आलेले पाहुणे बातम्या बघतायंत.’ ‘तुम्ही मित्रांसोबत गाडीवर फिरायला जाण्याचा प्लान केला होता पण बाबा गाडी घेऊन बाहेर गेलेत.’
असे अनेक प्रश्न घेऊन आता तुम्ही काय कराल यावर साधक बाधक चर्चा घ्यावी.
प्रत्यक्ष अशी परिस्थिती ओढवल्यावर निर्णय घेताना मन गोंधळलेले असते. पण चर्चा करताना मन शांत आणि निश्चिंत असते त्यामुळेच अधिक चांगला निर्णय घेतल्या जातो. या उपक्रमामुळे मुले लगेच चांगला निर्णय घेऊ शकतील अशी अपेक्षा करणे नक्कीच चुकीचे ठरेल पण शांत मनाने आणि सगळ्या बाजू लक्षात घेऊन, विचार करून निर्णय घेण्याचे महत्व मुलांना नक्कीच पटेल. प्रयत्नांनी मुले असा सगळ्या बाजूनी विचार करून निर्णय घेण्याचे शिकतील.
-          ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ – खेळघर हस्तपुस्तिकेतील लेखावर आधारित
कुमार निर्माणच्या गट बैठकीत देखील ही कृती करता येईल. विविध प्रसंग घेऊन त्यावर या परीस्थितीत तुम्ही काय कराल हा प्रश्न विचारता येईल.
यासाठी असे अनेक प्रसंग घेता येतील.
·        रात्री घरी येतानी अचानक दोन टारगट मुलांनी तुम्हाला अडवलं आणि पैसे मागितले.
·        तुम्हाला १ लाखाची लॉटरी लागली
·        तुम्ही परगावी गेलात आणि तुमचे पैसे संपले.
·        मोठ्या शहरात फिरायला गेलात आणि गटापासून लांब जाऊन हरवलात.
असे इतरही प्रसंग तुम्ही चर्चेसाठी घेऊ शकतात.

No comments:

Post a Comment